पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या उद्यानात खेळायला गेलेल्या साडेसहा वर्षीय मुलाला उजव्या पायाची करंगळी कायमची गमवावी लागली. अथर्व मयूर जोशी असे या मुलाचे नाव असून या घटनेनंतर महापालिका उद्यानांमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. या घटनेनंतर अथर्वच्या वडिलांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले असून शहरातील सर्व उद्यानाचे सर्वेक्षण करून तुटलेले खेळणे दुरुस्त करावेत, जेणेकरून दुसऱ्यांसोबत अशी दुर्घटना होणार नाही अशी मागणी केली आहे. सोमवारी संध्याकाळी पिंपरी- चिंचवडमध्ये राहणाऱ्या दिपा जोशी साडेसहा वर्षांचा मुलगा अथर्वला घेऊन महानगर पालिकेच्या शिव शाहू संभाजी उद्यानात गेल्या. त्याठिकाणी घसरगुंडीवर खेळत असताना घसरगुंडीचा तुटलेला पत्रा अथर्वच्या पायाला लागला. यामुळे त्याच्या उजव्या पायाची करंगळी तुटली. या घटनेनंतर अथर्वला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतू उशीर झाल्याने शस्त्रक्रिया करुन करंगळी पुन्हा जोडणे अशक्य झाले. दरम्यान, घटनेनंतर अथर्वचे वडील मयूर जोशी यांनी महापालिकेचे आयुक्त श्रवण हर्डीकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण वेळेअभावी आयुक्त भेटू शकले नाही, अशी माहिती मयूर जोशी यांनी 'लोकसत्ता ऑनलाइन'शी बोलताना दिली. शेवटी त्यांनी सहाय्यक आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे निवेदन दिले. संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी तसेच असे अपघात घडू नयेत म्हणून शहरातील सर्व उद्यानाचे सर्वेक्षण करून तुटलेल्या खेळण्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जोशी यांनी केली आहे. यावर दिलीप गावडे यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. महानगर पालिकेच्या वेळीच उद्यानातील खेण्याकडे लक्ष दिले असते तर अथर्वला पायाची करंगळी कायमची गमवावी लागली नसती.