विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांना चतुरस्र नारी पुरस्काराने रविवारी गौरविण्यात आले. सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या तीन स्वयंसेवी संस्थांना प्रत्येकी एक लाख रुपयांची देणगी प्रदान करण्यात आली. अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळातर्फे शारदा श्याम मानकर यांच्या तृतीय स्मृतिदिनाचे औचित्य साधून भारतबाई देवकर, अनुराधा आठवले, रेणुका दहातोंडे, सुमन मोरे, विनया देसाई, विजयमाला चव्हाण, शैला भोंडेकर, संगीता शेलार आणि मनीषा रणखांबे या नऊ महिलांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते चतुरस्र नारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी ११ हजार रुपये, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पालकमंत्री गिरीश बापट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर यांचे ‘आई’ या विषयावर व्याख्यान झाले. एचआयव्हीबाधित मुलांसाठी काम करणारी लातूर येथील सेवालय संस्था, अंध-अपंग-मनोरुग्ण व मतिमंदांचा सांभाळ करणारी नागपूर येथील श्रीकृष्ण शांतिनिकेतन संस्था आणि निराधार मुलांचा सांभाळ करणारी बीड येथील सहारा अनाथालय या तीन संस्थांना प्रत्येकी एक लाख रुपयांची देणगी प्रदान करण्यात आली. सेवालय संस्थेचे रवी बापटले, सहारा अनाथालयाचे संतोष गर्जे आणि श्रीकृष्ण शांतिनिकेतनच्या प्रज्ञा राऊत यांनी देणगीचा धनादेश स्वीकारला. मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर यांनी प्रास्ताविक केले.