पिंपरी महापालिकेच्या वतीने आयोजित महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कविसंमेलनात स्थानिक कवींनी चांगलाच रंग भरला व रसिकांची मने जिंकली. आई, काळी माती, स्त्री मुक्ती, सावित्री, लोकशाही अशा विविध विषयावरील कविता त्यांनी सादर केल्या. ‘अवघ्या जगास आता तारील बंधुता’, असा संदेश देऊन ‘या फिरूनी जन्म घ्या हो भीमराया’ म्हणत सादही घालण्यात आली.
पिंपरीतील आंबेडकर चौकात झालेल्या या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी सुरेश कंक होते. चंद्रकांत धस, राज आहेरराव, सुहास घुमरे, किशोर केदारी, अनिल दीक्षित, सविता इंगळे, संगीता झिंजुरके, महेंद्र गायकवाड, भाग्यश्री कुलकर्णी, पीतांबर लोहार, दपिंेश सुराणा, सुभाष सरीन, अॅड. गोरक्ष लोखंडे आदींनी कविता सादर केल्या. चंद्रकांत धस यांनी ‘अवघ्या जगास आता, तारील बंधुता’ ही कविता सादर केली. ‘काळी माती’ कवितेतून संगीता िझजुरके यांनी शहरी, तसेच ग्रामीण भागातील स्त्रियांच्या स्थितीचे वर्णन केले. महेंद्र गायकवाड यांनी ‘लोकशाही’ या कवितेतून घटना व सध्याची राजकीय स्थितीवर भाष्य केले. भाग्यश्री कुलकर्णी यांनी ‘स्त्री मुक्ती’वरील कविता सादर केली. पीतांबर लोहार यांनी ‘या फिरूनी जन्म घ्या हो भीमराया’ तर दीपेश सुराणा यांनी ‘हवाय सावित्रीचा बुलंद आवाज’ ही रचना सादर केली. सविता इंगळे यांनी ‘माहेर’, सुभाष सरीन यांनी सामाजिक आशयाची, किशोर केदारी यांनी समतेची, अनिल दीक्षित यांनी ‘आई’ या विषयावर, तर गोरक्ष लोखंडे यांनी ‘स्मशान’ ही कविता सादर केली. आहेरराव यांनी कवितेतून बाबासाहेबांना अभिवादन केले. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन अॅड. गोरक्ष लोखंडे यांनी केले.