गणेश पेठेत एका सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी काही तासांतच गुन्हा उघडकीस आणून चौघांना अटक केली आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समोर आले आहे. ओंकार सुभाष बढे (वय २२, रा. ५०५, गणेश पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अक्षय अकोलकर (वय २०), कुणाल रावळ (वय १९), तुषार भगत (वय १९) आणि योगेश डोंगरे (वय २०, रा. सर्व जण- नाना पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बढे हा सराईत गुन्हेगार असून मारामारी, लुटमार, पोलिसांच्या ताब्यातून पळून जाणे असे गुन्हे दाखल आहेत. बढे हा फुलविक्रीचा व्यवसाय करत होता. काही दिवसांपूर्वी अकोलकर याच्याशी वादावादी झाली होती. त्याच भांडणातून मंगळवारी रात्री बुरुड आळी येथून जात असताना त्याला गाठले. या वेळी पळून जाऊ लागला असता त्याचा पाठलाग करून कोयत्याने वार केले. बुधवारी पहाटे एका व्यक्तीला बढे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याने तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. या गुन्ह्य़ाचा तपास सुरू असताना पोलीस चौघे जण सासवडजवळील कानिफनाथ मंदिर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी दिली.