विमानतळासाठी जागा मिळवण्यात राज्य सरकारला अपयश पुणे शहराचा चोहोबाजूने होत असलेला विस्तार आणि पुणे परिसरात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची सुरू झालेली उभारणी यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाची आवश्यकता पुण्याला होती. त्यामुळे पंधरा वर्षांपूर्वी चाकण परिसरात विमानतळ उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र अनेक कारणांनी रखडलेल्या या विमानतळासाठी जागा मिळवण्यात शासन कमी पडले आणि अखेर येथील विमानतळ पुरंदरला हलला. विमानतळ येणार म्हणून चाकण परिसरात जमिनींना फार मोठा भाव आला होता. मात्र पुरंदरला विमानतळ गेल्यामुळे या भागाचा स्वप्नभंग झाला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांच्या दृष्टीने जवळ असलेल्या ठिकाणामुळे विमानतळासाठी चाकण येथील जागेला पसंती देण्यात आली होती. चाकणला विमानतळ होणार अशा हालचाली सुरू होताच या भागातील जमिनींचे भाव वाढले. उद्योगधंद्यांचे जाळेही येथे विस्तारले. विमानतळ आज होईल, उद्या होईल, उद्योगधंद्यांमुळे परिसराचा कायापालट होईल, अशी स्वप्ने दाखविण्यात आली. मात्र विमानतळाचे स्वप्न तीनवेळा जागा बदलूनही पूर्ण होऊ शकले नाही. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा होत असलेला विरोध, त्या त्या वेळची राजकीय परिस्थिती आणि त्यातून झालेले सोयीचे राजकारण यामुळे विमानतळाचे ‘टेकऑफ’ होऊ शकले नाही. पुरंदर तालुक्यात विमानतळ प्रस्तावित करण्यात आल्यानंतर तसेच त्याची घोषणा व पुढील प्रक्रिया सुरू झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींकडून याच परिसरात विमानतळ व्हावे, अशी मागणी सुरू झाली आहे. विमानतळाची आवश्यकता का? * जागतिकीकरण, आधुनिकीकरणामुळे पुणे शहरात विस्तार झपाटय़ाने होऊ लागला. ‘आयटी हब’ अशी शहराची ओळख झाली. या कालावधीत पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरातही अनेक लहान-मोठे उद्योग उभारले गेले. त्या दृष्टीने विमानतळाची आवश्यकता भासू लागली होती. * या वाहतुकीसाठी केवळ लोहगाव येथील विमानतळावरच अवलंबून राहावे लागते. मात्र हवाई दलाच्या ताब्यात असलेल्या या विमानतळाला खूपच मर्यादा आहेत. * ही परिस्थिती ओळखून नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सन १९९८ साली पहिल्यांदा प्रस्ताव तयार करण्यात आला. * प्रत्यक्ष विमानतळासाठी शासकीय पातळीवर २००२मध्ये हालचाली सुरू झाल्या. पुढे त्या कागदावरच राहिल्या. * विमानतळाचा प्रस्ताव तयार झाल्यामुळे या भागातील जमिनीला मात्र सोन्याचे भाव आले.