धर्म जागृत ठेवणे ही आज देशाची सर्वात मोठी गरज आहे आणि दहशतवाद, घुसखोरी यांसह सर्व प्रश्नांनाही जागृत, बलवान हिंदू समाज हेच एकमेव उत्तर आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी रविवारी केले.
भारतीय विचार साधना पुणे प्रकाशनातर्फे यंदापासून सुरू करण्यात आलेला ‘डॉ. अरविंद सदाशिव गोडबोले स्मृती लेखन पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार, लेखक ब. ना. जोग यांना प्रदान करण्यात आला. या वेळी जोशी बोलत होते. स्वामी गोविंददेवगिरी यांच्या हस्ते जोग यांना सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एकवीस हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या देशाची आजची सर्वात मोठी गरज जर कोणती असेल, तर ती धर्म जागृत ठेवण्याची आहे. भारतात जर धर्म जिवंत राहिला नाही, तर तो जगातही राहणार नाही आणि ते जसे भारताच्या हिताचे नाही तसे जगाच्याही हिताचे नाही, असे सांगून जोशी म्हणाले, की या देशातील हिंदू धर्म संपवण्यासाठी आजवर नानाप्रकारे शेकडो वर्षे प्रयत्न झाले; पण ते यशस्वी झाले नाहीत. समाजाने आता जागृत आणि बलवान झालेच पाहिजे. कारण दुर्बलांचे विचार कोणी ऐकत नाहीत. या देशापुढील प्रश्न, समस्या शक्तीने, प्रखरपणाने संपवण्याची आवश्यकता आहे.
प्रत्येक पावलावर सावधानता दाखवणे हाच धर्माचा आत्मा आहे, असे सांगून स्वामी गोविंददेवगिरी म्हणाले, की हिंदू धर्म जगला, तर जगातील मानवता जगेल; पण सर्वधर्मसमभावाचा प्रचार झाल्यामुळे हिंदुत्वाची धार बोथट झालेली दिसत आहे. जोग यांच्यासारख्या दीपस्तंभाला पुरस्कार देऊन आपले काम संपणार नाही, तर त्यांनी मांडलेल्या विचारांना बळकटी देणे हे सर्वाचे कर्तव्य आहे.
हिंदू समाजामधील जातिभेदाच्या उतरंडी संपवण्याचे अगदी मूलभूत स्वरूपाचे काम संघाने हाती घेतले आहे आणि मुंबईतील धारावीसारख्या झोपडपट्टय़ांमध्ये संघाचे काम करताना या गोष्टीची मलाही प्रचिती आली. हिंदू समाजामधील ही भेदांची परिस्थिती आता खूप बदलते आहे, समाज एक होत आहे याचा मला विशेष आनंद आहे, असे मनोगत जोग यांनी व्यक्त केले.
डॉ. श्रीरंग गोडबोले यांनी पुरस्काराची भूमिका विशद केली. संस्थेचे अध्यक्ष किशोर शशितल यांनी प्रास्ताविक आणि प्रदीप नाईक यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे पदाधिकारी शैलेंद्र बोरकर यांनी पुरस्काराच्या स्थायी निधीला या वेळी पन्नास हजार रुपयांची देगणी दिली.