पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानात राष्ट्रनिर्मितीची ताकद असून, हे अभियान नागरी सुराज्याचा शुभारंभ असल्याचे मत केंद्रीय वने आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
कोथरूड परिसरातील मयूर कॉलनी येथे आयोजित स्वच्छता मोहिमेत जावडेकर सहभागी झाले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, संयोजिका डॉ. प्राची जावडेकर, डॉ. संदीप बुटाला, नगरसेविका मोनिका मोहोळ आदी उपस्थित होते. या वेळी परिसरातील नागरिक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. जावडेकर म्हणाले, स्वच्छता मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कचऱ्याचे संकलन, घनकचरा व्यवस्थापन, नागरिकांना कचरा टाकण्यासाठी दर शंभर मीटरवर व्यवस्था आणि मलनिस्सारणाची महापालिकेने व्यवस्था करणे आवश्यक आहे.
देशात दररोज पंधरा हजार टन प्लास्टिक कचरा निर्माण होत आहे. त्यापैकी फक्त नऊ हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असून, उरलेल्या ६ हजार कचरा साचून राहत आहे. त्यामुळे पर्यावरणाची गंभीर समस्या निर्माण होत आहे. त्यामुळेच प्लास्टिक मुक्त भारत अभियान सुरू करण्यात आले असून त्याचा प्रारंभ शिरूर येथून होणार असल्याचेही जावडेकर यांनी सांगितले.