महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील बदलांचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ यांनी सुरू केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वात सोमवारपासून (२४ फेब्रुवारी) ‘शेती आणि प्रगती’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. पुण्यात २४ व २५ फेब्रुवारी रोजी हे चर्चासत्र होईल. त्यात राज्यातील शेती, शेतकऱ्यांची सद्य:स्थिती, अर्थकारण, नवे प्रयोग, आव्हाने आणि भविष्यातील वाटचाल अशा विविध विषयांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी सहभागी होणार आहेत.
या चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात सोमवारी ‘शेती आणि प्रगती’ या विषयावर  सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे आणि ज्येष्ठ कृषितज्ज्ञ, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी सहभागी होणार आहेत. त्यानंतरच्या सत्रात ‘शेती व सहकार’ या विषयावर चर्चा करण्यासाठी खासदार राजू शेट्टी, शेतितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, अर्थतज्ज्ञ प्रदीप आपटे सहभागी होणार आहेत. तिसऱ्या सत्रात शेतीचे नवे तंत्र, नवे वाण, नवे ज्ञान या विषयावर भाभा अणुसंशोधन केंद्रातील जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख शरद काळे, इस्रायलचे वाणिज्यदूत जोनाथन मिलर, डॉ. आनंद कर्वे, अतुल जैन सहभागी होणार आहेत.
दुसऱ्या दिवशी, मंगळवारी (२५ फेब्रुवारी) पहिल्या सत्रात ‘शेतीमधील अभिनव प्रयोग’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. ज्ञानदेव हापसे, एन.बी. म्हेत्रे, डॉ. दत्तात्रय वणे व संजय देशमुख सहभागी होणार आहेत. त्या दिवशी दुसऱ्या सत्रात ‘शेती व पाणी’ या विषयावरील चर्चेत जलसंपदा विभागाचे माजी सचिव डॉ. दि. मा. मोरे, माजी कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे, शेतितज्ज्ञ अरुण देशपांडे हे सहभागी होणार आहेत. समारोपाच्या सत्रात ‘शेती : अर्थकारण आणि भवितव्य’ या विषयावरील चर्चेत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील, निवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सरंगी व कृषी अर्थतज्ज्ञ मिलिंद मुरुगकर सहभागी होणार आहेत.
चर्चासत्राच्या उपस्थितांमध्ये शेतीक्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, प्रगतशील शेतकरी व अभ्यासकांचा समावेश आहे. हा कार्यक्रम पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ‘हॉटेल ताज विवांता’ येथे होणार आहे. तो केवळ निमंत्रितांसाठीच आहे.
‘बदलता महाराष्ट्र’मध्ये पुण्यात दोन दिवसांचे चर्चासत्र
काळासोबत बदलत असलेल्या महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांचा मागोवा घेण्यासाठी ‘बदलता महाराष्ट्र’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याच्या पहिल्या पर्वात शिक्षणव्यवस्था आणि दुसऱ्या पर्वात नागरीकरणाच्या आव्हानांचा वेध घेण्यात आला. त्यानंतर आता तिसऱ्या पर्वात शेतीक्षेत्राच्या सर्वागीण विकासाचा आढावा घेण्यात येणार आहे.