पिंपरी : शहरात अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा ओघ सुरु असतानाच महापालिकेच्या सेक्टर ११, १३ स्पाईन रस्त्यावरील जलवाहिनी अचानक गळती लागली. यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले. दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याने चऱ्होली, मोशी, डूडूळ गाव, बोऱ्हाडेवाडीसह या वाहिनीवरील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. सायंकाळी पाणीपुरवठा होणार नसून शुक्रवारचा विस्कळीत राहणार आहे.

आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट झाल्याने शहरातील पाणीपुरवठा आठ दिवस विस्कळीत झाला होता. समाविष्ट गावांसह उपनगरांमध्ये भीषण टंचाई निर्माण झाली होती. बुधवारपासून पूर्वीप्रमाणे ८० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. पण, पाणी टंचाईच्या तक्रारी कायम आहेत. त्यातच आता स्पाईन रस्त्यावरील जलवाहिनीला अचानक गळती लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामास वेळ लागणार आहे. त्यामुळे जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.

हेही वाचा – बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?

हेही वाचा – नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?

या जलवाहिनीवरून होणारा चऱ्होली, मोशी, डूडूळ गाव, बोऱ्हाडे वाडी, चोवीसवाडी, वडमुखवाडी, देहू रस्ता,चक्रपाणी वसाहत, इंद्रायणी नगर, सर्व प्राधिकरण सेक्टर क्रमांक ४,६,९,११, १३ तसेच चक्रपाणी वसाहत, सद्गुरूनगर या सर्व भागाचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा चालू करण्यात येईल. या परिसराचा आजचा यापुढील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच उद्याचा पाणीपुरवठा हा अनियमित, कमी वेळ, कमी दाबाने आणि विस्कळीत राहील असे पाणीपुरवठा विभागाने सांगितले. गळती लवकरात लवकर काढून पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन, कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांनी केले.