‘स्वच्छतेकडून स्वास्थ्याकडे’ असा संदेश देत रास्ता पेठेतील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या अध्यापक व विद्यार्थ्यांनी अमृतेश्वर घाट ते ओंकारेश्वर पूल दरम्यानच्या नदीपात्राची स्वच्छता केली. या उपक्रमात नदीपात्रालगत मोठय़ा ५५ पिशव्या कचरा जमा करण्यात आला.
महाविद्यालयातर्फे १ ते ७ ऑक्टोबर हा आठवडा ‘अहिंसा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत सुमारे ३०० विद्यार्थी आणि अध्यापकांनी कचरा जमा केला. श्रमदानातून सार्वजनिक स्थळांची स्वच्छता करुन शहराचे आरोग्य राखावे, अशी जनजागृती या वेळी करण्यात आली. या व्यतिरिक्त ‘अहिंसा सप्ताहा’च्या अंतर्गत २ ऑक्टोबर रोजी अहिंसा दिन पाळण्यात आला. विद्यार्थी, अध्यापक आणि प्राचार्यानी ‘येस टू पीस, नो टू व्हॉयलन्स’ अशी अहिंसेची शपथ या वेळी घेतली. तसेच ४ ऑक्टोबर रोजी ‘खादी दिन’ साजरा करण्यात आला. राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. वि. वि. डोईफोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदानंद देशपांडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास जायभाग यांनी कार्यक्र मांचे आयोजन केले होते.