मुलांवर चांगले संस्कार करणे ही आजच्या काळाची मुख्य गरज आहे. नव्या पिढीला चांगले ज्ञान दिले गेले पाहिजे. चांगले संस्कार केले पाहिजेत. त्यामुळे समाजाचाही स्तर उंचावेल. जगातील सर्वाधिक संत आपल्या देशात होऊन गेले. आपली भारतीय संस्कृती महान आहे आणि ती जगभरात पोहोचावी यासाठी प्रयत्न केले जावेत, असे आवाहन आचार्य सुधांशू महाराज यांनी शनिवारी केले.महापालिकेतर्फे सुधांशू महाराज यांचा शनिवारी खास सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. महापौर चंचला कोद्रे यांच्या हस्ते सुधांशू महाराज यांना सन्मानचिन्ह, मानपत्र, गुलाबपुष्पांचा हार आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, एमआयटीचे संस्थापक डॉ. वि. दा. कराड, वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास यांच्या चरणी हा सत्कार अर्पण करत आहे, असे सुधांशू महाराज यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. भारतीय संस्कृतीची महतीही त्यांनी यावेळी सांगितली. जगातील सर्वाधिक संत आपल्या भूमीत होऊन गेले. ही महान संस्कृती आता जगभर पोहोचली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. नव्या पिढीला चांगले ज्ञान आणि संस्कार द्या, असेही आवाहन त्यांनी केले. विज्ञानाला अध्यात्माची जोड देणे आवश्यक आहे. जीवनाची प्रगती करायची असेल, तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही, असे प्रकाश महाराज यांनी सांगितले.