सौरभ कुलश्रेष्ठ swapnasaurabh.kulshreshtha@expressindia.com

आतापर्यंत ठाकरे व शिवसेनेने मोदी यांच्या सरकारच्या धोरणांवर इतकी टीका केली आहे, की पुन्हा एकत्र येण्यासाठी एक सुरक्षित युक्तिवाद गरजेचा ठरतो. त्यासाठी राम मंदिर कामी आले..

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आम्ही काही तुमचे दुश्मन नाही. तुमचा पराभव व्हावा आणि आम्ही तिथे बसावे, अशी काही आमची इच्छा नाही.. लोक म्हणतात की, तुम्ही भाजप सरकारवर इतकी टीका करता, मग त्यांच्यासोबत का राहता? तर हिंदुत्वासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत.. बाबरी मशीद पडून इतकी वर्षे लोटली तरी राम मंदिर का उभारले जात नाही?.. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील ही विधाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची. ठाकरे यांच्या जवळपास तासाभराच्या भाषणात ही विधाने विखुरलेली असलेली तरी त्यात एक सूत्र आहे. शिवसेनेचा सन्मान जपल्यास लोकसभा निवडणुकीत युतीचे शिवसेनेला वावडे नाही आणि हिंदुत्व व राम मंदिर हा त्या युतीचा आधार असेल असे संकेत उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यातील भाषणातून दिले. त्यानंतर दोनच दिवसांनी उद्धव ठाकरे यांनी शिर्डी व अहमदनगरचा दौरा केला आणि मोदी यांच्या कारभारावर टीका करताना राज्यात सर्व लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले. ‘आम्ही सत्तेसाठी लाचार नाही,’ असेही त्यांना आवर्जून सांगावे लागले. दसरा मेळाव्यात समेटाचे संकेत दिल्यानंतर पुन्हा दोन दिवसांत टीका आणि स्वबळ अजमावण्याच्या जोरबैठका हे कसे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे; पण गेली चार वर्षे उद्धव ठाकरे व त्यांची शिवसेना हीच राजकीय कसरत तर करत आहे. प्रसंगी चेष्टा-अवहेलना, सत्तेसाठी लाचारीचे आरोप सहन करत का होईना शिवसेनेचे राजकीय महत्त्व आणि स्वतंत्र अस्तित्व याच कसरतीच्या जोरावर ठाकरे यांनी टिकवून ठेवले आहे.

विसंगत दिसणाऱ्या राजकीय भूमिका वारंवार घेणे हे शिवसेनेच्या नशिबीच आले आहे; पण ते वारंवार घडू लागले ते राज्यातील २०१४ मधील विधानसभा निवडणुकीनंतर. भाजपने पक्षविस्तारासाठी आयत्या वेळी शिवसेनेसोबतची युती तोडली. निकाल लागले तेव्हा १२२ जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, पण बहुमताचा आकडा दूरच राहिला. त्या वेळी शिवसेना आधी विरोधी बाकांवर बसली. फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनात शिवसेनेचे एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेतेपदी बसले; पण त्यानंतर काही दिवसांत शिवसेना सत्तेत सहभागी झाली आणि महिन्याभराने नागपूर येथील अधिवेशनात एकनाथ शिंदे सरकारचे सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) म्हणून विधिमंडळाला सामोरे गेले. शिवसेनेचे हे धरसोडीचे राजकारण राज्यात मोठय़ा चेष्टेचा विषय ठरले. राज्यात सत्ता चाखण्याची संधी शिवसेनेसमोर १५ वर्षांनंतर असताना ठाकरे यांनी ती सोडली असती तर पक्ष फुटण्याचा धोका होता. हे राजकीय वास्तव स्वीकारत, चेष्टा सहन करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला. त्यानंतरच्या काळातही ‘शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे खिशात आहेत’ हा इशारा असाच पोकळ ठरला. त्यावरूनही विरोधकांपासून ते समाजमाध्यमांवरील सर्वसामान्यापर्यंत अनेकांनी शिवसेनेची टर उडवली. त्याकडे दुर्लक्ष करत शिवसेना सत्तेत कायम आहे. कारण सत्तेतून बाहेर पडलो तर शिवसेनेचे किती आमदार सोबत राहतील, याचा काही नेम नाही, याची जाणीव ठाकरे यांना आहे. त्याऐवजी सत्तेत राहून त्याआधारे मिळणाऱ्या रसदीचा वापर करत शिवसेनेला भाजपच्या स्पर्धेत टिकवणे अधिक सोपे आहे हे समीकरण त्यामागे आहे.

युतीत व सत्तेत भागीदार असूनही मोदी-शहा यांची भाजप आपल्या पक्षाला संपवण्याच्या मागे लागली आहे आणि शिवसेनेचे मर्मस्थान असलेली मुंबई महापालिकेची सत्ता हे त्यांचे लक्ष्य आहे, हे ठाकरे यांच्या लक्षात २०१४च्या विधानसभा निवडणुकीवेळीच आले होते.

अशा राजकीय वातावरणात सत्तेत भागीदार आहोत म्हणून शिवसेना गप्प राहिली तर ती केवळ मम म्हणण्यापुरती राहील आणि त्यातून शिवसेनेची ओळख व अस्तित्वच पुसले जाईल हे चाणाक्ष राजकारणी असलेल्या उद्धव ठाकरे यांनी ओळखले. त्यातूनच भारत-पाकिस्तान संबंध, नोटाबंदी, महागाई, इंधन दरवाढ, अच्छे दिन अशा धोरणात्मक व लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर मोदी सरकारवर हल्ले चढवण्यास शिवसेनेने सुरुवात केली. विरोधक आहेत की नाहीत असे चित्र असताना सत्तेत असूनही शिवसेना लोकांच्या प्रश्नावर थेट मोदींना सुनावण्यास कमी करत नाही, आक्रमक भूमिका घेते हे सातत्याने बिंबवले जाऊ  लागले. शिवसेनेची स्वतंत्र राजकीय ओळख टिकवण्याचे आणि विरोधकांची जागा व्यापण्याचे राजकारण ठाकरे यांनी त्यातून साध्य केले. फक्त एक अडचण झाली. ठाकरे यांच्या धोरणानुसार त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजप सरकारवर हल्ले चढवले, पण भाषेचे ताळतंत्र सुटले. अति झाले आणि त्यातून शिवसेनेचे हसू झाले. सत्तेत राहून अंकुश ठेवणारा पक्ष याऐवजी सत्तेसाठी लाचार पक्ष अशी प्रतिमा शिवसेनेची झाली. ही प्रतिमा केवळ माध्यमांमध्ये असती तर उद्धव ठाकरे यांनी त्यास कवडीची किंमत दिली नसती; पण लोकांच्या आणि खुद्द शिवसैनिकांच्याही मनात हीच प्रतिमा गडद होत आहे हे ठाकरे यांनी जाणले. म्हणूनच शिवसेना सत्तेसाठी लाचार नाही, हे स्पष्टीकरण देण्याची वेळ येऊ लागली.

दसरा मेळावा हा शिवसेनेच्या राजकीय वाटचालीचा संकेत देणारा मेळावा म्हणून ओळखला जातो. सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या राणा भीमदेवी थाटातील शिवसेनेच्या गर्जना या दसरा मेळाव्यातील भाषणातही झाल्या. भाजपला गाडून टाकण्याची भाषा झाली. सरकारचा शिवराळ उल्लेख झाला; पण ते सारे इतर नेत्यांनी केले. याउलट उद्धव ठाकरे यांच्या भाषणात कुठेही भाजपबद्दलचा विखार दिसला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा उल्लेख वक्री शनी-मंगळ असा नाव न घेता ठाकरे यांनी केला; पण नाव घेण्याची वेळ आली तेव्हा- मोदीजी, आम्ही काही तुमचे दुश्मन नाही, असाच संदेश दिला. शिवसैनिकांना २०१९च्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले; पण ‘स्वबळ’ हा शब्दच उच्चारला नाही. ठाकरे यांनी या भाषणातून संभाव्य युतीसाठी कवाडे जाणीवपूर्वक उघडी ठेवली. कारण सध्याचे प्रतिकूल राजकीय वातावरण आणि लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांत उमेदवार शोधून ठेवत, पक्षाची यंत्रणा उभारण्यात शिवसेनेकडून झालेले दुर्लक्ष. याउलट भाजपने एकीकडे युतीची इच्छा जाहीर करायची आणि दुसरीकडे स्वबळाची तयारी करायची हे धोरण काटेकोरपणे राबवले. सर्व मतदारसंघांत बूथ पातळीवर कार्यकर्ते सज्ज ठेवले. ठाकरे यांना या राजकीय वास्तवाची जाण आहे. त्यामुळे मनात मोदी-शहांबद्दल कितीही राग असला, युती करण्याची मनापासूनची इच्छा असो किंवा नसो, निवडणुकीत स्वतंत्र लढलो तर भाजप-शिवसेना आपसांत लढून जायबंदी होण्याची चिन्हेच अधिक.

शिवाय सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांत उमेदवार मिळणे आणि १८ जागा पुन्हा जिंकणे तर दूरच, पण उमेदवारी देण्यासाठी आहेत ते १८ खासदार टिकणेही कठीण जाईल याची कल्पना शिवसेना नेतृत्वास आली आहे. विधानसभेच्या तोंडावर असले आत्मघातकी राजकारण करण्याऐवजी राज्यात दौरा करून शिवसेनेची ताकद गोळा करत लोकसभेसाठी युती करण्याची तयारी ठेवायची हेच उद्धव ठाकरे यांचे धोरण दिसते. आपण जाहीर केलेले स्वबळाचे राजकीय धोरण, भाजपवर केलेली टोकाची टीका याला चिकटून राहण्यापेक्षा शिवसेनेचे राजकीय महत्त्व कायम राहील, असाच निर्णय घेण्याचा धोरणीपणा उद्धव ठाकरे दाखवतील.

आतापर्यंत ठाकरे व शिवसेनेने मोदी यांच्या सरकारच्या धोरणांवर इतकी टीका केली आहे, की पुन्हा एकत्र येण्यासाठी एक सुरक्षित युक्तिवाद गरजेचा ठरतो. राम मंदिराचा वारंवार उच्चार आणि हिंदुत्वाचा जयघोष या ठाकरे यांच्या नव्या पवित्र्यामागे तीच योजनाबद्ध राजकीय चाल आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती भाजपचे वैचारिक पालकत्व करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेशी सुसंगत आहे. सेना व संघ या दोघांनी मोदी सरकारच्या कारभाराबाबत वेळोवेळी आक्षेप नोंदवले आहेत. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांचे भाषण हे त्याचे ताजे उदाहरण आणि आता शिवसेना व संघ दोघेही राम मंदिराचा आणि हिंदुत्वाचा उच्चार करत आहेत. कारण अच्छे दिन आणि विकासाच्या राजकारणाचे दाखले देत लोकांना भुलवणे कठीण जाणार आहे हे उद्धव ठाकरे आणि संघ दोघांनी ओळखले आहे. त्यामुळे मतदारांच्या झुंडींना पुन्हा आपल्या मागे आणण्यासाठी आणि स्वबळावरून पुन्हा युतीची कवाडे उघडण्यासाठी शिवसेना हिंदूुत्वाचा जयघोष करत पुन्हा रामाच्या दारी उभी ठाकली आहे.