राजेश बोबडे गुरूची महती सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : सद्गुरू ज्ञानस्वरूप आहे असे धरूनच सद्गुरूची महती ठिकठिकाणी गायिली जाते. ज्ञानामध्ये जरी प्रकार असले तरी त्या ज्ञानाचे अंतिम लक्ष आत्मज्ञान, स्वरूपज्ञान, अंतरज्ञान, सम्यकज्ञान असेच योजिले गेले आहे. हे जरी खरे असले तरी भक्तगण ‘ज्ञानाद्वारे गुरूकडे’ जाण्यापेक्षा गुरूकडे प्रथम जातात व अन्य प्रकाराने श्रद्धा वाढवतात. चमत्कार इत्यादींच्या प्रभावामुळे खऱ्या सदाचाराला, नीतीला, उपासनेला, तसेच इंद्रिय संयमाला, आत्मज्ञानाला (अशा शिष्यांकडून) दूरच ठेवले जाते आणि हा गुरू सांगेल तेच सर्व काही, असे गृहीत धरून गुरूचे जे खरे मार्गदर्शन असते ते विसरतात. त्याने समाजात मोठीच दरी निर्माण होते आणि मग खरे संत कोण, गुरू कोण हा प्रश्न निर्माण होतो. माझ्या मते गुरूला ज्ञानानेच ओळखले जावे व तेही परोक्षज्ञानापेक्षा अपरोक्ष ज्ञानाच्या अनुभवाने ओळखले जाणे जरुरी आहे. आजकाल निव्वळ चार पोथ्या वाचून वा दोन-पाच अभंगांचे पाठांतर करून इकडचे तिकडचे प्रवचन ऐकून काही माणसे गुरूपणाचे सोंग आणतात. हे सर्व होऊ नये असे माझे म्हणणे नाही पण जसा अघोरी डॉक्टर नुसते सर्टिफिकेट मिळवून हजारो रोग्यांच्या प्राणाशी खेळ खेळतो तसा हा निव्वळ सोंग घेऊन साधू झालेला माणूस केवळ चमत्काराच्या जोरावर हजारो श्रद्धावंतांना धर्मापासून, नीतीपासून, राष्ट्रकर्तव्यापासून पतनाकडे घेऊन जातो. त्यांना माणुसकीपासून वंचित करून आपलेच हित साधतो. या प्रवृत्तीला आळा बसणे अत्यंत जरुरी आहे. माझ्या मते ज्ञानाची उत्तम मीमांसा करणारे व अचारणशील साधना साधणारे व राष्ट्रधर्म, माणुसकी शिकविणारे गुरू असतील त्यांनाच गुरूपणाचा मान देणे, आदर देणे जरूर आहे. असे काहीतरी होईल तेव्हाच संस्कृतीची परंपरा राखता येईल; नाही तर आता ही साधूची व गुरूंची बजबजपुरी फार त्रासदायक झाली आहे. माझ्या बोलण्याचा कोणी गैरअर्थ करू नये की, मी पंथांच्या साधूंच्या विरोधात आहे! पण ज्ञानाने, सदाचाराने, निव्र्यसनाने व जनकल्याणाच्या भावनेनेच गुरू ओळखला जावा. नाही तर, जो वाटेल त्या मार्गाचा अवलंब करून लोकांना भुरळ घालील तोच गुरू अशी व्याख्या होऊ लागेल. मनोरंजनालाही माझा विरोध नाही, पण असे मनोरंजन नको की ज्याने समाजाची व ज्ञानमार्गाची धारणाच नष्ट होईल. गुरूची परंपरा केवळ जातीवर अथवा वयावर आधारलेली असावी असे मी मानत नाही. मनुष्य कर्मानेच अधिकारी बनतो या मताचा मी आहे. संत वा साधू हा जातींनी वा पंथांनी निर्माण होत नाही तो आपल्या अनुभवाने, त्यागाने, ज्ञानाने, आचारशीलतेने बनत असतो. अनेक महापुरुषांच्या अनुभवाने हे सिद्ध झालेले आहे. अशी अधिकार परंपरा निर्माण करणारे आश्रम, संस्था या देशात निर्माण होणे आवश्यक आहे तरच देशाचे, धर्माचे अस्तित्व शाबूत राहील. महाराज ग्रामगीतेत लिहितात : गुरु हाडामांसाचा नोहे। गुरु नव्हे जाती-संप्रदाय। गुरु शुद्ध ज्ञानतत्वचि आहे। अनुभवियाचे।। rajesh772@gmail.com