पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना राज्याच्या आर्थिक परिस्थितीची चांगलीच जाणीव असली पाहिजे. अन्यथा नव्याने पोलीस भरतीचा आग्रह त्यांनी सोडून दिला नसता. नागपूरमध्ये बोलताना, त्यांनी अशी भरती न करण्याचे धोरण जाहीर केले आणि पोलीस मित्र या संकल्पनेवर भर देण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील पोलिसांवर पडत असलेला भार दिवसेंदिवस वाढत असताना नव्याने पोलिसांची संख्या वाढवणे ही आत्ताची तातडीची गरज आहे. गेली अनेक वर्षे पोलिसांची संख्या कमी असल्याची तक्रार यापूर्वीचे अनेक अधिकारी करत आले आहेत आणि त्याकडे आर्थिक कारणांसाठी सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. गेल्या दशकभरात राज्यावरील अतिरेक्यांचे संकट वाढले आहे आणि अशा परिस्थितीत गुन्हेगारांना शोधून काढण्याच्या कामासाठी सध्याचे पोलीस दल अपुरे पडत आहे. महत्त्वाच्या व्यक्तींना संरक्षण देणे आणि राज्यात विविध ठिकाणी घडत असलेल्या सामूहिक कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्यात पोलीस दलाची शक्ती मोठय़ा प्रमाणात खर्च होत असते. राज्यात सध्या हवालदार असलेल्या पोलिसांची संख्या १.८० लाख आहे. त्यात वाढ होण्याबरोबरच अधिकारी पदांवरही नव्याने नियुक्त्या होणे अत्यंत आवश्यक आहे. शहरे वाढू लागल्यानंतर सुरक्षिततेचा मुद्दा अधिक काळजीत पाडणारा ठरू लागला आहे. दुष्काळामुळे शहरांकडे धावणारे लोंढे गेल्या काही दिवसात वाढत आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवणे, त्यांना सुरक्षा पुरवणे ही नवी कामगिरी आता पोलिसांवर पडली आहे. अशा स्थितीत केवळ पोलीस मित्रांवर अवलंबून राहण्याने पोलीस दलाची कार्यक्षमता वाढेल, असे जर दीक्षित यांना वाटत असेल, तर ते धोक्याचे आहे.