नरेंद्र मोदी

भारत जी-ट्वेंटीचे अध्यक्षपद भूषविताना सार्वत्रिक एकत्वाची भावना अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करेल. म्हणूनच ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ अशी संकल्पना निश्चित करण्यात आली आहे..

tirupati laddu quality improved devotees appreciate says cm chandrababu naidu zws
तिरुपती लाडूच्या गुणवत्तेत सुधारणा! भाविकांकडून प्रशंसा : मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा दावा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
BJP Chintu Verma
Garba Pandal: ‘गरब्यात प्रवेश करण्यासाठी गोमूत्र प्राशन करायला द्या, जेणेकरून…’, भाजपा नेत्याचे अजब तर्कट
nitin gadkari
नागपूर:‘लोकसभा’ जिंकण्यासाठी गडकरींनी केला होता ‘हा’ नवस…
pm narendra modi rally
पंतप्रधानांच्या सभास्थळी चिखल, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी; जेसीबीच्या साहाय्याने खडी टाकून…
Loksatta sarva karyeshu sarvada Review of 11 organizations working for society
सर्वकार्येषु सर्वदा : भटक्या जमातींना रस्ता शोधून देण्यासाठी धडपड
Sanglit kruti Committee warns that Gadkari will be shown black flags for opposing Shaktipeth
शक्तिपीठ’च्या विरोधासाठी गडकरींना काळे झेंडे दाखवणार, सांगलीत कृती समितीचा इशारा
sahyadri sankalp society work for growth and conservation of ratnagiri forests
सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरण संवर्धनासाठी ‘सह्याद्री संकल्प’चे मदतीचे आवाहन

 ‘जी-ट्वेंटी’ समूहाचे अध्यक्षपद याआधी १७ देशांनी भूषविले. त्या सर्वानीच आर्थिक स्थैर्यासाठी, आंतरराष्ट्रीय कररचनेच्या सुसूत्रीकरणासाठी, विविध देशांवर असलेले कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी लक्षणीय योगदान दिले आहे. त्यांच्या या योगदानाचा आपल्याला लाभ होणार आहेच, त्यांच्या आधारावरच आपल्याला भविष्याची उभारणी करायची आहे.

आज भारत ही एक महत्त्वाची जबाबदारी स्वीकारत असताना, माझ्या मनात प्रश्न आहे की, जी-ट्वेंटी आज जिथे आहे, तिथून आणखी पुढे जाऊ शकेल का? मानसिकतेत मूलभूत परिवर्तन घडवून आणण्याच्या प्रक्रियेला आपण गती देऊ शकतो का? असे परिवर्तन जे अवघ्या मानवतेच्या कल्याणाचा विचार करेल..

आपण हे करू शकतो, असा मला विश्वास वाटतो. आपली मानसिकता आजूबाजूच्या परिस्थितीनुसार आकार घेते. आजवरच्या इतिहासात मानव नेहमीच दुर्भिक्षांचा सामना करत आला आहे. आपण, मर्यादित संसाधनांसाठी भांडलो, कारण इतरांना ती न मिळू देण्यावर, ती नाकारण्यावरच आपले अस्तित्व अवलंबून होते. कल्पना, आदर्श आणि ओळख यांमधील संघर्ष आणि स्पर्धा हा एक नियमच होऊन गेला आहे. आजही आपण त्याच जुन्या मानसिकतेत अडकलो आहोत. आजही भूप्रदेशासाठी किंवा संसाधनांसाठी अनेक देश परस्परांशी लढताना दिसतात. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा प्रश्न  एखाद्या शस्त्रासारखा वापरला जाताना दिसतो. कोटय़वधी लोक साथीच्या सावटाखाली वावरत असतानाही लशींची साठेबाजी केली जात असल्याचे दिसते. 

कदाचित असाही युक्तिवाद केला जाईल, की संघर्ष आणि लोभ, या मानवाच्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत. पण असे म्हणणाऱ्यांशी मी सहमत नाही. मानव सुरुवातीपासून स्वार्थी प्रवृत्तीचा होता, असे मानले तर, मग एकत्व या मूलभूत तत्त्वाचा उपदेश करणाऱ्या ज्या अनेक आध्यात्मिक परंपरांनी आपला चिरस्थायी ठसा समाजावर उमटवला आहे, त्यांचा अर्थ काय? कोणी हे स्पष्ट करेल का?

असाच एक विश्वास भारतात रुजला आहे. तो म्हणजे पंचमहाभूतांविषयीचा विश्वास. सर्व सजीव, प्राणिमात्र आणि एवढेच नव्हे, तर अगदी निर्जीव घटकही पंचमहाभूतांचा भाग आहेत. ही पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि अवकाश ही पंचतत्त्वे आहेत. या सर्व घटकांमध्ये सौहार्द आहे, एकत्व आहे. हेच सौहार्द आपल्यात सामावलेले आहे, परस्परांतही आहे. आपल्या भौतिक, सामाजिक तसेच पर्यावरणीय कल्याणासाठी ते अत्यंत आवश्यक आहे.

जी-ट्वेंटीचे अध्यक्षपद भूषविताना भारत हीच सार्वत्रिक एकत्वाची भावना अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करेल. म्हणूनच आम्ही ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ अशी संकल्पना निश्चित केली आहे.  ही केवळ एक घोषणा नाही. यात, मानवाच्या भवतालात अलीकडे झालेले बदल विचारात घेण्यात आले आहेत. हे बदल समजून घेण्यात आजवर आपण सगळेच अपयशी ठरलो आहोत. आज आपल्याकडे, जगभरातील सर्वाच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील, एवढे उत्पादन करण्यासाठी पुरेशी साधने उपलब्ध आहेत.

आज, आपल्याला आपल्या अस्तित्वासाठी झगडण्याची गरज नाही- आपले युग हे, युद्धाचे युग ठरण्याची गरज नाही- किंबहुना, हे युद्धाचे युग ठरताच कामा नये!

आज, आपल्यासमोर सर्वात मोठी आव्हाने आहेत ती हवामान बदल, दहशतवाद आणि जागतिक साथी. या आव्हानांचा सामना एकमेकांशी भांडून नाही, तर एकत्रित काम करूनच करणे शक्य होणार आहे.

यातली सकारात्मक बाब म्हणजे आजचे तंत्रज्ञान आपल्याला मानवतेसमोरील व्यापक समस्यांचा सामना करण्यासाठीची साधने उपलब्ध करून देत आहे. आज आपण ज्या विशाल आभासी जगात राहतो आहोत, त्यातून आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या सर्वव्यापकतेचेच दर्शन घडते. जागतिक लोकसंख्येच्या सहाव्या भागाइतकी लोकसंख्या जिथे वसली आहे आणि भाषा, धर्म, चालीरीती आणि धारणा यांमध्ये कमालीची विविधता आहे, असा भारत म्हणजे संपूर्ण जगाची एक लहानशी प्रतिकृतीच आहे.

सामूहिक निर्णय प्रक्रियेची सर्वात प्राचीन परंपरा असलेल्या भारताचे लोकशाहीच्या पायाभरणीत महत्त्वाचे योगदान आहे. लोकशाहीची जननी म्हणून भारतामध्ये कोण्या एका व्यक्तीच्या हुकमाने नव्हे तर लाखो लोकांच्या मुक्त आवाजातून निर्माण होणाऱ्या सुसंवादाच्या एका सुरामधून राष्ट्रीय सहमती निर्माण होते. 

आज भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. आपल्या नागरिककेंद्री शासनाच्या प्रारूपात जशी सर्वात उपेक्षित घटकांची काळजी घेतली जाते, तशीच अतिशय प्रतिभासंपन्न युवा वर्गाच्या सर्जनशील गुणवत्तेचीही जोपासना केली जाते. आपण राष्ट्रीय विकासाला शासनव्यवस्थेतील वरून खालपर्यंत असलेल्या उतरंडीमधील एक प्रक्रिया न बनवता नागरिककेंद्री लोकचळवळ बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण तंत्रज्ञानाचा वापर पूर्णपणे खुल्या, समावेशक सार्वजनिक डिजिटल सामग्रीची निर्मिती करण्यासाठी केला आहे. त्यामुळे सामाजिक सुरक्षा, आर्थिक समावेशन आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स अशा विभिन्न क्षेत्रांत क्रांतिकारक प्रगती करणे शक्य झाले आहे.

या सर्व कारणांमुळे संभाव्य जागतिक प्रश्न सोडविण्यासाठी भारताचा अनुभव  महत्त्वपूर्ण ठरू शकेल. जी-ट्वेंटी अध्यक्षपद आपल्याकडे असेल त्या काळात आपण आपले अनुभव, आपण काय काय शिकलो ते आणि आपली प्रारूपे सादर करणार आहोत. त्यांचा विशेषत: विकसनशील देशांना खूप उपयोग होईल.

आपले जी-ट्वेंटीचे प्राधान्यक्रम आपण केवळ आपल्या जी-ट्वेंटी भागीदारांबरोबरच सल्लामसलत करून ठरवणार नाही, तर बऱ्याचदा ज्यांचे म्हणणे कधीच ऐकले जात नाही, अशा दक्षिण आशियातील इतर देशांचे म्हणणे ऐकून घेऊन ठरवले जातील. 

आपले प्राधान्यक्रम ठरवताना एक निश्चित दृष्टिकोन आहे. ही पृथ्वी आपल्या सगळय़ांची आहे. तिची सध्याची बिघडलेली परिस्थिती सुधारणे, सगळे जग हे आपले कुटुंब आहे, त्यात सुसंवाद, सामंजस्य निर्माण करणे आणि आपल्या भविष्याची सुंदर स्वप्ने पाहणे याला म्हणजेच, ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’   यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे.

स्वत:ला निसर्गाचे विश्वस्त मानणे ही खास भारतीय परंपरा आहे. तिला अनुसरून आपण वागू. त्यानुसार आपल्या पृथ्वीची सध्याची स्थिती सुधारण्यासाठी आपण शाश्वत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणार आहोत.

अखिल मानवजातीमध्ये सुसंवाद वाढवण्यासाठी आपण अन्न, खते आणि वैद्यकीय उत्पादने या गोष्टींचे आदानप्रदान करताना अगदी जागतिक पातळीवरदेखील राजकारण करणार नाही. या गोष्टी राजकारणविरहित राहतील असे बघू. त्यामुळे देशादेशांमध्ये संघर्ष होणार नाहीत. आपल्या कुटुंबात ज्याप्रमाणे ज्यांना एखाद्या गोष्टीची सर्वात जास्त गरज असते, त्यांनाच सगळय़ात जास्त प्राधान्य दिले जाते, तशीच जगाच्या बाबतीतदेखील आपली भूमिका असेल. 

आपल्या भावी पिढय़ांचे जगणे आनंदमय व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. महाविनाशकारी शस्त्रांमुळे निर्माण झालेले धोके, असुरक्षितता कमी होणे आवश्यक आहे. जगात सुरक्षित वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे जगातील सर्वाधिक शक्तिशाली देशांमध्ये सुसंवाद निर्माण होण्याला आपण प्रोत्साहन देणार आहोत. भारताचा जी-ट्वेंटी जाहीरनामा समावेशक, महत्त्वाकांक्षी, कृतीआधारित आणि निर्णायक असेल.

चला, भारताचा जी-ट्वेंटी अध्यक्षपदाचा काळ हा परिस्थिती सुधारणारा, सुसंवाद निर्माण करणारा आणि आशा निर्माण करणारा ठरावा यासाठी आपण सगळे जण एकत्र येऊ या. मानवकेंद्रित जागतिकीकरणाच्या नव्या आदर्शाला आकार देण्यासाठी एकत्र काम करू या.