आत्मनिर्भरतेतून मिळवलेला आनंद चिरकाल टिकणारा असतो, कारण तो निर्मितीच्या मुक्तगंगेत भिजलेला असतो. मात्र, निर्मितीचे भव्य स्वप्न केवळ स्वप्नरंजनाने साकार होत नाही; ते फुलते रक्त, घाम आणि अश्रू यांच्या त्रिवेणी संगमातूनच.. ही बाबा आमटेंची असीम श्रद्धा होती. याच श्रद्धेच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट घासून पाहत आनंदवनाचा आत्मनिर्भरतेचा प्रवास सुरू झाला. आनंदवनातील उद्योगांच्या पायाभरणीचा आधारही ‘श्रम’ हाच होता. “You can live without fingers; but you can not live without self-respect. If you have lost your seven fingers, you still have three fingers intact. Use them, but don’t lose your dignity…” अशी जबरदस्त प्रेरणा बाबांनी कुष्ठरुग्णांच्या मनात रुजवली.

शेतीसोबत दुग्धशाळा, बैलघाणी, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन असे शेतीपूरक उद्योग पन्नाशीच्या दशकात आनंदवनात जोमाने सुरू झाले. आनंदवन हे स्वयंपूर्ण ग्राम बनावे यादृष्टीने ग्रामोद्योगाची एक एक-एक प्रवृत्ती आनंदवनात बाळसे धरू लागली. उद्योग सुरू करण्यामागे आणखी एक कारण होतं. बहिष्काराचा आणि तिरस्काराचा शाप आजन्म सहन करणारे कुष्ठरुग्ण मनाने पूर्णत: खचून गेलेले असत. समाजाने तर त्यांना वाळीत टाकलंच; पण कुटुंबाकडून, सख्ख्या नातेवाईकांकडून घराबाहेर काढलं गेल्याचं दु:ख शब्दातीत असे. त्यातच औषधोपचारादरम्यान नसांच्या प्राणांतिक वेदना अस होऊन ही माणसं अक्षरश: गुरासारखी ओरडताना आम्ही पाहिलं होतं. त्यामुळे त्यांचं मन गुंतून राहील असा काहीतरी उपाय शोधून काढला नाही तर निराशेच्या गर्तेत ओढली गेलेली ही माणसं एक तर ठार वेडी होतील किंवा मृत्यूला तरी कवटाळतील, हे बाबांना जाणवत होतं. अगदी सुरुवातीच्या काळात काहींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्या होत्या, तर काहींनी धानाच्या तणशीच्या गंजीत जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कुष्ठरुग्णांना कोणत्या ना कोणत्या कामात सतत गुंतवून ठेवलं पाहिजे असं बाबांचं ठाम मत बनलं होतं.

१९५४ च्या सुरुवातीस ‘सव्‍‌र्हिस सिव्हिल इंटरनॅशनल’ (रउक)  संघटनेच्या देशोदेशीच्या स्वयंसेवकांच्या मदतीने आनंदवनात पक्क्या इमारती उभ्या राहिल्या. त्यानंतर दवाखान्याचे वॉर्डस्, क्वार्टर्स, स्वयंपाकघर, इ. इमारतींच्या बांधकामासाठी लागणाऱ्या विटा इथेच तयार करायच्या असं बाबांनी ठरवलं आणि विटा पाडण्याचा उद्योग आनंदवनात सुरू झाला. त्या काळातील सर्व इमारती कौलारू होत्या. त्यांचं बांधकाम विटांचं, त्यावर चुन्याचं प्लास्टर आणि छत लाकडी सांगाडय़ाचं. मग लाकडी सांगाडा उभा करण्यासाठी म्हणून सुतारकाम सुरू झालं. अशा प्रकारे सुरुवातीच्या काळात आनंदवनातले उद्योग आणि सेवा (Services) गरजांप्रमाणे विस्तारू लागल्या.

सिस्टर लीलांनी जी माणसं आनंदवनाशी जोडली त्यात भारताचे स्वित्र्झलडमधील तत्कालीन राजदूत एम. के. वेल्लोदी (ICS) आणि त्यांच्या पत्नी यांचाही समावेश होता. १९५८ च्या उत्तरार्धातली गोष्ट. वेल्लोदी दाम्पत्य एकदा स्वित्र्झलडच्या राजधानीत- बर्नमध्ये फेरफटका मारत असताना त्यांना “Schweizer Auslandhilfe” (पुढे या संस्थेचं नामकरण ‘स्विस एड अ‍ॅब्रॉड’- SWISS AID ABROAD) असं झालं.) या संस्थेची पाटी दिसली. कुतूहलापोटी त्यांनी संस्थेत जाऊन चौकशी केली असता त्यांना कळलं की, स्विस एड अ‍ॅब्रॉड जगभरातल्या विधायक कामांना आर्थिक साहाय्य करते. वेल्लोदी दाम्पत्याने स्विस एड अ‍ॅब्रॉडला उत्साहाने आनंदवनाबद्दल माहिती दिली. मात्र, आपल्या प्रतिनिधीमार्फत संस्थेची समक्ष चौकशी करून कामाबद्दल खात्री पटली की मगच संस्थांना मदत देण्याचं स्विस एड अ‍ॅब्रॉडचं धोरण होतं. गंमत अशी, की ‘सव्‍‌र्हिस सिव्हिल इंटरनॅशनल’च्या माध्यमातून आनंदवनाशी जोडले गेलेले स्वित्र्झलडचे पिअर ऑप्लिगर हेच स्विस एड अ‍ॅब्रॉडचे भारतातील Liaison Officer होते! त्यामुळे स्विस एड अ‍ॅब्रॉडला वेगळ्या चौकशीची गरजच पडली नाही.

उद्योगातून निर्माण होणारं उत्पादन आनंदवनात तर उपयोगी पडायला हवंच; शिवाय बाहेरही सहजगत्या विकलं जायला हवं, या भूमिकेवर बाबा ठाम होते. ग्रामीण बाजारपेठेत विकली जातील अशी दैनंदिन वापराची कोणकोणती उत्पादनं असू शकतात याचा विचार त्यांच्या डोक्यात सतत घोळत असे. टिनाच्या पत्र्यापासून चाळण्या, गाळण्या, डबे, दिवे, चिमण्या, कंदील अशा जीवनावश्यक वस्तू तयार केल्या तर त्यांना ग्रामीण बाजारपेठ नक्की उपलब्ध होईल याची बाबांना खात्री होती. त्याकाळी उंदरांचा सर्वत्र प्रचंड सुळसुळाट असे. हे उंदीर टिनाच्या डब्यांखेरीज कशालाही दाद देत नसत. त्यामुळे सगळीकडे बहुतांशी टिनाच्याच वस्तू वापरल्या जात. त्यामुळे टिनाच्या पत्र्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग आनंदवनात सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री खरेदी करण्याबाबतची योजना बाबांनी स्विस एड अ‍ॅब्रॉडला सादर केली. त्यांच्या अधिकाऱ्यांनाही ही योजना पसंत पडली. स्विस एड अ‍ॅब्रॉडचे Vice-Secretary General अर्न्‍स्ट स्नेलमन यांचं सदर आशयाचं पत्र बाबांना प्राप्त झालं. या संस्थेने आनंदवनाला चक्क ३० हजार स्विस फ्रॅंक्सची मदत देण्याचं ठरवलं. अशा प्रकारे आनंदवनातील ‘टिन कॅन प्रोजेक्ट’ची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि आनंदवनाच्या विकासातील एका महत्त्वाच्या पर्वाला, कुष्ठरोग्यांच्या मानसिक-सामाजिक-आर्थिक पुनर्वसनासंबंधीच्या बाबांच्या कल्पनेतील कृषि-औद्योगिक समाजव्यवस्थेच्या प्रतिमानाला आकार येण्यास सुरुवात झाली. २८ नोव्हेंबर १९६० या दिवशी ‘टिन कॅन प्रोजेक्ट’चं औपचारिक उद्घाटन करण्यासाठी स्वित्र्झलडचे भारतातले राजदूत Dr.Jacques-Albert Cuttat आनंदवनात आले होते. त्यावेळी आनंदवनातल्या कुष्ठमुक्त बांधवांना उद्देशून ते म्हणाले, ‘‘ You help me to help you, to help yourself.ll Dr.Cuttat यांचं हे वाक्य आनंदवनातील कुष्ठरुग्णांसाठी पथदर्शी ठरलं. किंबहुना, बाबांची पुनर्वसनाची कल्पना याच विचाराशी मिळतीजुळती होती.

भारताचे पंतप्रधान पंडित नेहरूंनी याप्रसंगी आवर्जून पत्र पाठवून बाबांचे अभिनंदन करताना म्हटलं, “I congratulate you on the good work that is being done at Anandwan. Our ambassador to Switzerland, Shri. M. K. Vellodi wrote to me about the “Schweizer Auslandhilfe” organization giving some help to Anandwan. I am sure you will utilize this to great advance. The idea of starting an apprenticeship workshop is a good one. With all good wishes…”

बत्तीस हजार पाचशे रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीतून हा उद्योग सुरू झाला. लवकरच आनंदवनात तयार झालेले डबे, गाळण्या, चाळण्या वगैरे वस्तू आसपासच्या आठवडी बाजारांमध्ये लोकप्रिय होऊ  लागल्या. यासाठीचा कच्चा माल (डालडा, खाद्यतेल, मोबिल ऑइलचे रिकामे डबे) मुंबईवरून रेल्वे वॅगन्सद्वारे प्रचंड प्रमाणात यायचा. पहिल्या वर्षांत ‘टिन कॅन प्रोजेक्ट’मार्फत तब्बल पंच्याहत्तर हजारांचा माल विकला गेला याचं अनेकांना आश्चर्य वाटलं; पण बाबांना मात्र या यशाची खात्री होती, कारण त्यांचं नियोजनच तसं होतं. परिसरातल्या मागणीचा नीट अभ्यास करून त्यांनी या उद्योगाची पायाभरणी केली होती. उद्योगास आवश्यक तेवढं भांडवल, आवश्यक तितकीच यंत्रसामुग्री आणि तुलनेने अधिक श्रम हे बाबांचं सुरुवातीच्या काळातलं गणित होतं. ते म्हणत, ‘‘कमी भांडवल आणि जास्त श्रम अशा श्रमप्रधान तंत्राने आपल्या गरजा भागवल्या गेल्या तर भारतासारख्या श्रमबहुल देशातील रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. गरजांचे स्वरूप जसजसे बदलत जाईल तसतसे उत्पादन तंत्रही श्रमप्रधानतेकडून भांडवलप्रधान दिशेने विकसित होईल. पण भारतासारख्या श्रमबहुल देशात एकदमच अतिभांडवलप्रधान तंत्र स्वीकारले गेले तर ते सामान्य माणसाच्या गरजाही भागवू शकणार नाही आणि येथील रोजगारही इष्ट दराने वाढणार नाही.’’

ही प्रवृत्ती सुरुवातीची २० वर्षे जोमात सुरू होती. मात्र, पुढे पुढे ‘टिन कॅन प्रोजेक्ट’साठी आवश्यक कच्च्या मालाचे वाहतूक भाडे दुपटीपेक्षा अधिक आकारण्यास रेल्वेने सुरुवात केली. कारण या मालाचे वजन (वस्तुमान) कमी आणि आकारमान जास्त असे! वाघिणींमार्फत मालाची वाहतूक करणारी रेल्वे वजनाधारित मालभाडं आकारत असे. या भाडेवाढीमुळे कच्चा माल परवडेनासा झाला. दरम्यान, प्लास्टिकच्या वस्तूंचाही प्रसार मोठय़ा प्रमाणात होऊ  लागला. पर्यायाने टिनाच्या वस्तूंचा वापर तसाही कमी होत गेला. असं असलं तरी ‘टिन कॅन प्रोजेक्ट’ आनंदवनातल्या ‘मेटल फॅब्रिकेशन’ उद्योगाचा पाया ठरला. या कामाची सुरुवात केली गिरीधर राऊत या तरुणाने. कुष्ठरोगाने पीडित गिरीधर १९५८ साली आनंदवनात आला तेव्हा त्याचं वय असेल सतरा-अठरा. अंगावर चट्टे दिसू लागल्यावर त्याने शाळा सोडली आणि तो आनंदवनात दाखल झाला. त्याचं गाव वध्र्याजवळचं हिंगणघाट. आनंदवनात आल्यावर सुरुवातीचा काही काळ त्याने शेतीत, दवाखान्यात कामं केली. १९६० मध्ये ‘टिन कॅन प्रोजेक्ट’ सुरू झाल्यावर त्याची जबाबदारी बाबांनी गिरीधरच्या खांद्यावर टाकली. खरं तर त्याने याआधी कुठल्या फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये काम केलं नव्हतं. पण गिरीधरची चिकाटी, काम धसास लावण्याची जिद्द आणि नेतृत्वगुण बाबांनी हेरले होते. उद्योग उभे करायचे तर अशाच आश्वासक तरुणांच्या बळावर, ही बाबांची कामाची पद्धत. त्यानुसार त्यांनी गिरीधरला टिन कॅन प्रोजेक्टमध्ये काम करायला सांगितलं. आणि त्यानेही ते काम समर्थपणे पेललं, पुढे वाढवलं. बाबा गिरीधरचा उल्लेख अभिमानाने आमचा ‘मेकॅनिकल इंजिनीयर’ असा करायचे.

आनंदवनात कुष्ठरुग्णांना राबवून घेतात, हे अशास्त्रीय आहे, अमानवी आहे, वगैरे पुष्कळ टीका बाबांवर  झाली. प्रख्यात कुष्ठरोगतज्ज्ञ डॉ. पॉल ब्रँड यांनीही बाबांवर या आशयाचे ताशेरे ओढले होते. पण बाबा आपल्या भूमिकेवर अढळ राहिले. कुष्ठरुग्णांच्या जखमांची, अपंगत्वाची सुयोग्य काळजी घेऊन मगच त्यांना आनंदवनात काम दिलं जात असे. पुढे डॉ. ब्रँड यांनी आपली चूक कबूल केली.

आनंदवन ही कुष्ठरोग्यांची वसाहत नाही, तर ते एक कुष्ठमुक्तांनी चालवलेलं उत्पादन केंद्र आहे, याची जाणीव बाहेरच्या जगाला होऊ  लागली. आनंदवनाची ओळख जगाशी नाळ तुटलेली वसाहत अशी असता कामा नये, हा बाबांचा हेतू उद्योगधंद्यांमुळे साध्य झाला. महत्त्वाचं म्हणजे आनंदवनातील विविध वस्तूंना मागणी होती ती त्यांच्या दर्जामुळे- हे सुखद होतं. संधी मिळाली तर आम्ही हवं ते करून दाखवू शकतो, हा संदेशच कुष्ठरुग्णांनी विविध उद्योगांच्या यशस्वी पायाभरणीतून बाहेरच्या जगाला दिला. आणि हा संदेश फक्त कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनापुरताच मर्यादित आहे असं मला वाटत नाही. कारण बाबा नेहमीच म्हणायचे, ‘‘अगर मेरे कुष्ठरोगी कर सकते है, तो कोई भी कर सकता है.’’ देशातल्या बेरोजगारीच्या प्रश्नाला कुष्ठरुग्णांनी दिलेलं हे सडेतोड उत्तर होतं.

vikasamte@gmail.com

लं..