डॉ. रोहिणी पटवर्धन rohinipatwardhan@gmail.com प्रत्येक ज्येष्ठाला किमान ६ ते ८ गोष्टींचे ढोबळ ज्ञान तरी हवेच हवे. हे ज्ञान जोपर्यंत मिळवणार नाहीत तोपर्यंत त्याचे महत्त्व पटणार नाही. त्यासाठी हे प्रशिक्षण प्रत्येकाने घ्यायलाच हवे आहे. पण या क्षेत्रात सखोल आणि सातत्यपूर्ण ज्ञानार्जन करणाऱ्यांची मोठी वानवा आहे तेथे प्रशिक्षण देणार कोण? त्यासाठी प्रशिक्षकांचे प्रशिक्षण या विचारांचा आधार घ्यायला हवा. हे प्रशिक्षक कोण? कुठे शोधायचे? तर ज्येष्ठोत्सवाच्या सहभागी ज्येष्ठांमध्ये हे सापडण्याची शक्यता वाटते. निश्चितपणे वाटते. या ‘संहिता साठोत्तरी’मध्ये आपल्या सर्वाबरोबर एक प्रसन्न अनुभव शेअर करायचा आहे. ‘सनवल्र्ड ज्येष्ठोत्सव’च्या माध्यमातून एकूण ४०० पेक्षा जास्त ज्येष्ठांच्या आयुष्यात उत्साह आणि आनंद निर्माण करता आला याच्या समाधानाने मन काठोकाठ भरून गेलं आहे. अनेक वर्ष ज्येष्ठांबरोबर आणि ज्येष्ठांसाठी काम करताना लक्षात आलं जे लोक भरतकाम, विणकाम, फुले करणे, चित्रकला, कविता किंवा लेखन काहीही असो, छंद जपतात ती अधिक क्रियाशील, उत्साही आणि सकारात्मक विचारांची असतात. त्यांचं चीज आपण करावं, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, या भावनेतून ‘ज्येष्ठोत्सव’ या कल्पनेचा उगम झाला आणि त्यातून जे अनुभवायला मिळालं ते खूप मोठं होतं, प्रेरणादायी होतं. ज्येष्ठोत्सव स्पर्धा घेण्यामागचा मूळ उद्देश ज्येष्ठांमधले वैयक्तिक कौशल्य आणि सामूहिक कौशल्य जाणून घेणे हा होता. त्यामध्ये भरतकाम, विणकाम कागदी/कापडी फुले, काव्यपूर्ती, कल्पना-विस्तार या वैयक्तिक कौशल्यासाठी आणि समूहगीत, वादविवाद, पथनाटय़ आणि गटचर्चा या सामूहिक कौशल्य लागणाऱ्या स्पर्धा घेतल्या. या सर्वाबरोबर एकांकिका स्पर्धाही ठेवल्या होत्या. एकांकिका स्पर्धेपूर्वी २ महिने नाटय़प्रशिक्षणाची सोय सुप्रसिद्ध अभिनेते उदय लागू यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून दिली होती. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून एकांकिका स्पर्धेमध्ये १४ ज्येष्ठांच्या संघटनांनी भाग घेतला होता. जवळ जवळ २५० ते ३०० ज्येष्ठ यात प्रत्यक्ष सहभागी झाले होते. प्रेक्षक वेगळे. यात कोणत्या स्पर्धा कशा घेतल्या कोणाला बक्षिसे मिळाली हे सर्व महत्त्वाचं आहेच पण यानिमित्ताने मला सांगायचं आहे ते वेगळंच आहे. ही ज्येष्ठांची ऊर्जा, सर्जनशीलता वाया जाते आहे का? ८०व्या वर्षी हुबेहूब गुलाबाची फुले करणाऱ्या आजींच्या क्षमतेचा आपण वापर करून घेऊ शकतो का? एकीकडे ज्येष्ठांच्या गरजा विविध आहेत, खूप तर आहेतच! पण त्या पूर्ण करण्याकरिता आपण त्यांच्यातल्याच किंवा त्यांच्यापैकी निदान काहींच्या क्षमतेचा वापर करू शकतो का? ‘साठोत्तरी’च्या याआधीच्या अनेक लेखांमधून मी सातत्याने सर्वाना आवाहन करत आले की ज्येष्ठांनो आपल्यात खूप मोठय़ा क्षमता आहेत, श्रमशक्ती, अर्थशक्तीसुद्धा आहे. ज्येष्ठोत्सवामध्ये ज्येष्ठांसाठी गेली आठ वर्षे मी एकांकिका स्पर्धा घेते म्हणजे एक प्रकारे नाटय़ोपचार पद्धत वापरून ज्येष्ठांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम करते. पण त्याच्या परिणामकारक उपयोग करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इच्छाशक्तीचाच अभाव आहे. अर्थात त्यालाही एक कारण आहे. आपल्या सेवानिवृत्तीनंतर आपण काय करू शकू किंवा करता येईल याचा विचारच केलेला नाही. ती तशी जागरूकता पन्नाशीच्या पुढे कोणीच त्यांच्यात निर्माण केलेली नाही. संपूर्ण आयुष्य बँकेत घालवणारा माणूस अर्थविषयक सल्ला देत नाही (किंवा सल्ला द्यायला घाबरतो.) रिटायर्ड जज्ज कायदेविषयक सल्ला देत नाही. शिक्षक शिकवायचे सोडून देतो. ‘एलआयसी’ तला अधिकारी मार्गदर्शन करत नाही. ही यादी प्रत्येक पेशागणिक कितीही लांबत जाऊ शकेल पण एक नक्की सेवानिवृत्तीनंतर बरेचदा आत्मविश्वासच गमावून बसलेले लोक आढळतात. ज्येष्ठांची १५ वर्षे नाटकं बसविणाऱ्या ७८ वर्षांच्या कमलिनी फडके या नाटक बसवायचं थांबवतात तेव्हा नाटकांमध्ये सहभाग घेणंच बंद होतं. पण कुणी पुढाकार घेऊन ते काम शिकत नाहीत किंवा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्नही करत नाहीत. प्रत्येक क्षेत्रात असंच आढळत आहे किंवा असंही असेल कदाचित की आज त्यांना स्वत:ला गरज वाटत नाही म्हणून आजूबाजूच्या मदतीची, सल्ल्याची गरज असणाऱ्या व्यक्ती त्यांना दिसत नाहीत. इतके ज्येष्ठ स्वयंकेंद्रित झालेले असतील? गंभीर गोष्ट अशी की जे आज मदतीचा हात पुढे करत नाहीत त्यामुळे इतरांना त्यांच्या ज्ञानाचा फायदा होत नाही. पण त्यांच्यापेक्षा जे मदत करत नाहीत त्यांचेच खूप मोठे नुकसान होते आहे. पुढच्या परावलंबित्वाला ते आमंत्रण देत आहेत हे त्यांना कधी कळणार? पण असो, ढगांच्या सोनेरी कडा आकर्षक दिसल्या तरी ढगांचे काळेपण झाकले जात नाही तसे ज्येष्ठोत्सवाच्या प्रतिसादामुळे आनंदित झालेलं मन पुन्हा पुन्हा ज्येष्ठांच्या निष्क्रियतेच्या काळजीमुळे झाकोळून जातं एवढं मात्र खरं. तर या ज्येष्ठोत्सवाच्या निमित्ताने साप्‘ाडलेल्या ऊर्जेचा वापर मी कसा करणार आहे, मला कसा करता येणार आहे हे इथे मला सांगायचं आहे. प्रत्येक ज्येष्ठाला किमान ६ ते ८ गोष्टींचे ढोबळ ज्ञान तरी हवेच हवे. त्यात अर्थकारण, समाजकारण, मानसशास्त्र, कायदा, वैद्यकीय उपचार यांबरोबरच आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची जाण येण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान आणि कौशल्य, तंत्रज्ञानाने काबीज केलेल्या अनेक क्षेत्रांचे जुजबी ज्ञान अशाही गोष्टींबाबत ज्ञान असणे ‘मस्ट’ आहे. हे ज्ञान जोपर्यंत मिळवणार नाहीत तोपर्यंत त्याचे महत्त्व पटणार नाही. त्यासाठी हे प्रशिक्षण प्रत्येकाने घ्यायलाच हवे आहे. पण या क्षेत्रात सखोल आणि सातत्यपूर्ण ज्ञानार्जन करणाऱ्यांची मोठी वानवा आहे तेथे प्रशिक्षण देणार कोण? (मी द्यायचं म्हटलं तर कोण्याही एकटय़ा दुकटय़ाचे हे काम नाही.) त्यासाठी प्रशिक्षकांचे प्रशिक्षण या विचारांचा आधार घ्यायला हवा. हे प्रशिक्षक कोण? कुठे शोधायचे? तर ज्येष्ठोत्सवाच्या सहभागी ज्येष्ठांमध्ये हे सापडण्याची शक्यता वाटते. निश्चितपणे वाटते. एकदा स्वत:कडे, स्वत:च्या मनामध्ये खोलवर डोकावून बघा आणि स्वत:ला प्रश्न विचारा १) मी संपूर्णपणे सक्षम आहे ना? २) मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे माझ्या बुद्धीचा वापर करून नोकरी/व्यवसाय केला आहे ना? ३) आर्थिकदृष्टय़ा संपन्न नसलो कदाचित तरी किमान सुस्थिर आहे ना? ४) मी माझा वेळ कौशल्य, क्षमता दुसऱ्या कोणासाठी वापरतो का? वापरत नसल्यास काही कारण आहे का? या सगळ्या प्रश्नांना तुमची तुम्ही दिलेली उत्तरे किमान ५० टक्के तरी सकारात्मक असतील तर तुम्ही खूप मोठे कार्य करू शकाल. संशोधनाने सिद्ध झालेले आहे की दुसऱ्यासाठी निरपेक्षपणे काम करणाऱ्या व्यक्ती अधिक गुणवत्तापूर्ण आणि आनंदी जीवन जगतात. .. त्यामुळे मग तुम्ही प्रशिक्षक होण्यासाठी अगदी योग्य व्यक्ती आहात. प्रशिक्षण कोण देणार? कधी देणार? त्यासाठी तुम्ही मला ई-मेल करू शकता. आणि ई-मेल अकाऊंट नसेल तर जीमेल अकाऊंट उघडून मेल करा. कारण माहिती तंत्रज्ञानाचे बोट धरल्याशिवाय आपल्या कोणाचाच ‘उद्धार’ होणार नाही हे सत्य स्वीकारावे लागतेच आहे. प्रत्येक शहरांमधून अशा निवडक ज्येष्ठांना पूर्वपरीक्षा घेऊन प्रशिक्षण मिळू शकेल आणि ते ज्येष्ठ त्या त्या गावात इतरांना ते प्रशिक्षण देऊ शकतील. त्यातून ज्येष्ठकल्याणासाठीचा मार्ग आपल्या सर्वानाच सापडू शकेल. पर्यायाने आपण आपले म्हातारपण जास्तीत जास्त सुखकर करू शकू असा मला पूर्ण विश्वास आहे. वर उल्लेखिल्याप्रमाणे ज्येष्ठोत्सव निरनिराळ्या शहरांमध्ये आयोजित करता येईल. त्यासाठी मी मार्गदर्शन करण्यास तयार आहे. संपर्कासाठी ई-मेल दिलेला आहेच. या आयोजनामागे आणखी एक शास्त्रीय हेतू होता. संगीत, नृत्य, नाटय़, चित्रकला इत्यादींचा व्यक्तीच्या विकासासाठी वापर करून त्यांचा ‘उपचार’ म्हणूनपण वापर केला जातो त्याला कलोपचार पद्धत आर्ट बेस थेरपी (एबीटी) असे म्हणतात. यावर खरं तर लेख लिहिणार होते पण वर्ष संपत आले. पुण्यामध्ये नाटय़, नृत्य इत्यादी वापर करून उपचार करण्यासाठी आनंद चाबुकस्वार आणि ऋषिकेश पवार मोठय़ा निष्ठेने काम करत आहेत. शेवटी - मनाच्या समृद्धीसाठी, कलांच्या सादरीकरणासाठी, समाजभान जागृतीसाठी, सहभागातून समृद्धीसाठी हा मार्ग आहे. chaturang@expressindia.com