सर्व शस्त्रक्रिया, चाचण्या, औषधे यापुढे विनामूल्य; महापालिका खर्च करणार

सुहास बिऱ्हाडे, वसई

वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सर्वच वैद्यकीय सेवा आता विनामूल्य होणार आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या औषधापासून शस्त्रक्रियेचा खर्च महापालिकेतर्फे केला जाणार आहे.

महापालिकेकडे सध्या दोन रुग्णालये, तीन माता बालसंगोपन केंद्रे, २१ आरोग्य केंद्रे आहेत. या रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण तपासणीसाठी तसेच उपचारांसाठी दाखल होत असतात. त्यांच्या विविध तपासण्या, तसेच शस्त्रक्रिया केल्या जातात. महापालिकेकडून काही औषधांचा पुरवठाही केला जातो, तर काही औषधे बाहेरून आणण्यासाठी लिहून दिली जातात. मात्र अनेक रुग्णांना रुग्णालयातून बाहेर गेल्यानंतरही औषधांचा भार सहन करावा लागतो, तसेच वारंवार रुग्णालयात यावे लागते. या रुग्णांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना तर औषधांसाठी वारंवार यावे लागते. अनेकांना डायलिसीस करूनन घ्यावे लागते. तात्कालीन महापौर प्रवीणा ठाकूर यांच्या लक्षात या बाबी आल्यानंतर त्यांनी आरोग्य सेवा मोफत कशी करता येईल यासाठी पालिका प्रशासनापुढे पाठपुरावा केला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आस्थापना वगळता ३६ कोटी रुपयांची वार्षिक तरतूद आहे, तर आरोग्य विभागासाठी २० कोटी रुपये खर्च होत असतो. बाह्य़ रुग्णांकडून महापालिकेला दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. आरोग्य सेवा मोफत केल्याने महापालिकेवर तीन पटीने आर्थिक भार पडणार आहे.

महापालिकेकडे २१ आरोग्य केंद्रे असून त्यात वाढ केली जाणार आहे. १५ आरोग्य केंद्रे वाढवली जाणार आहे. १०० खांटांचे ट्रॉमा केअर सेंटर उभारले जाणार आहे. पालिकेकडे सध्या जूचंद्र (नायगाव), सातिली (वसई) आणि सर्वोदय नगर (नालासोपारा) येथे तीन माता बालसंगोपन केंद्रे असून त्यात महिलांची विनामूल्य प्रसूती केली जाते. विरारच्या नारिंगी आणि नाळा येथे आणिखी दोन माता बालसंगोपन केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. महापालिका आता दंकचिकित्सेपासून अनेक शस्त्रक्रिया आणि चाचण्या मोफत करणार आहे, असे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र चौहान यांनी सांगितले. एकदा रुग्ण उपचारासाठी दाखल झाला की त्याचा सर्व खर्च पालिका करणार आहे, तसेच नंतरही त्याला लागणारा सर्व उपचार मोफत केला जाणार आहे.

सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेसाठी आम्ही आर्थिक भार सोसून हा निर्णय घेतला आहे. याचा फायदा वसई-विरारमधील तळागाळातील सर्व नागरिकांना होईल. खासगी रुग्णालयातून होणारी आर्थिक लूट यामुळे थांबणार आहे, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला.

एखादा रुग्ण महापालिकेच्या कुठल्याही सेवेचा लाभ घेण्यासाठी आला तर संपूर्ण खर्च विनामूल्य केला जाणार आहे. केवळ रुग्णांना मोफत उपचार आणि औषधेच नाही तर उत्तम दर्जाची आरोग्य सेवा महापालिका पुरवणार आहे.

– सतीश लोखंडे, आयुक्त, वसई-विरार महापालिका