विणकरांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिवंडीचा इतिहास अनेक महत्त्वपूर्ण बाबींनी भरलेला आहे. राजा भीमदेव यांच्या कारकीर्दीत नावारूपास आलेल्या भिमडी या शहराचे नाव पुढे भिवंडी झाले. भिवंडीची भौगोलिक रचना व्यापारीदृष्टय़ा आदर्श अशी आहे. जलमार्ग आणि भूमार्गाच्या ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या शहरात पुढे वस्त्रोद्योग नावारूपाला आला. राजा भीमदेव यांच्या कारकीर्दीत नावारूपास आलेले भिमडी ऊर्फ भिवंडी हे एक ऐतिहासिक नगर. मुस्लीम राजवटीत काही फारशी पत्रांतून इस्लामपूर असेही नामाभिधान झालेले दिसते. दुसरे अनुमान असे की, उत्तरेकडून आलेल्या बिंब राजांनी प्रथम भिवंडी जिंकून मग ठाणे जिंकले. प्रथम बिंबाने भिवंडी जिंकले म्हणून ‘बिंबस्थान’. पुढे बिंबस्थानावरून भिवंडी नाव तयार झाले. भिवंडी ही विणकरांची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. गेली अनेक शतके कोटय़वधी भारतीयांची कापडाची मूलभूत गरज भागविणाऱ्या उद्यमशील भिवंडी शहराला सांस्कृतिक जडणघडणीचा गौरवपूर्ण इतिहास लाभला आहे. ठाणे गॅझेट, मुंबई गॅझेट आणि ऐतिहासिक दस्तावेज पाहता इ. स. आठव्या शतकापासून भिवंडीच्या इतिहासाचा मागोवा घेता येतो. ठाणे गॅझेटियर प्रकरण १९ मध्ये पान क्र. ९८६ वर भिमडी ऊर्फ भिवंडी या नावाचा इतिहास पाहताना त्या काळी हिंदू-मुस्लीम सलोखा किती घनिष्ठ होता यावर प्रकाश पडतो. बगदाद येथील एक मुस्लीम संत शेख हुसेन काद्री ऊर्फ पीर शाह हुसेन साहेब यांनी बगदाद सोडले व ते विजापूरचा बादशहा आदिलशहाकडे आले. त्याच सुमारास आदिलशहाचा मृत्यू झाला. हुसेन साहेबांनी १७ वर्षे आदिलशाहाचा राज्यकारभार सांभाळला आणि राजपुत्र राज्यकारभार पाहण्यालायक झाल्यावर विजापूरची सर्व सत्ता त्याच्या हाती सोपवून भिवंडीची वाट धरली. याच सुमारास भिवंडीमध्ये ‘भीम’ नावाच्या हिंदू राजाला पोर्तुगीजांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता पीर हुसेन साहेबांनी भीम या हिंदू राजाला सर्वतोपरी मदत करीत पोर्तुगीजांना पळवून लावले. हिंदू राजाला मदत करणाऱ्या या मुस्लीम संताला पुढे ‘बाबा दिवाणशाह’ म्हणून ओळखले जाऊ लागले. बाबा दिवाणशहाचा दर्गा आजही भिवंडीत प्रसिद्ध असून दरवर्षी या ठिकाणी मोठा उरूस भरतो. या उरुसामध्ये हजारो हिंदू-मुस्लीम दग्र्याचे दर्शन घेतात. इ. स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. छत्रपती संभाजी राजे (१६८३) व थोरले बाजीराव पेशवे (इ. स. १७२०) यांच्या पाऊलखुणा जपणारी अशी ही ऐतिहासिक भिवंडी आहे. भिवंडीची भौगोलिक रचना ही व्यापारीदृष्टय़ा आदर्श अशा जलमार्ग व भूमार्गाच्या ऐन मोक्याच्या ठिकाणी असल्याने भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या उद्यमशील विणकरांनी पारंपरिक हातमाग व पुढे यंत्रमाग (पॉवरलूम) द्वारे वस्त्रोद्योग निर्मितीत भिवंडीचे नाव जागतिक स्तरावर नेऊन ठेवले. यंत्रमाग व यंत्रमागाच्या सुटय़ा भागांचे कारखाने, बैलगाडीची चाके, भातगिरणी, भातगिरणीची मशिनरी बनविण्याचे कारखाने सुरू झाले. रस्ते तयार होऊ लागले. भोवतालचे जग जवळ येऊ लागले. सुधारणांचे वारे आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा अर्थ समजू लागला. स्वातंत्र्याचे, सार्वभौमत्वाचे महत्त्व समजू लागले आणि मग भिवंडीतले हिंदू-मुस्लीम स्त्री-पुरुष भारतीय स्वातंत्र्यलढय़ात एकदिलाने सामील होऊ लागले. चिमाजी आप्पांच्या वसई संग्रामात महत्त्वाची भूमिका बजाविणारे अंजूरचे गंगाजी नाईक यांच्या पाचव्या पिढीतील गजानन ऊर्फ काका नाईक हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संघटनेत सामील झाले होते. ठाण्याच्या बी. जे. हायस्कूलमध्ये शिकत असताना शिवजयंती उत्सव, रामनवमी, गणपती उत्सव इत्यादीमार्फत त्यांनी सुरू केलेल्या प्रचारामुळे त्यांना हायस्कूलमधील ११ महिने काढून टाकले होते. पुढे १९१२ मध्ये काका नाईकांना राजद्रोहाच्या खटल्यात गोवून १२४अ कलमाखाली १८ महिने कारावास व २०० रुपये दंडाची शिक्षा झाली. काका नाईक पुढे १९४२ च्या आंदोलनातही नाशिकच्या तुरुंगात स्थानबद्ध होते. होमरूल लीगच्या प्रचारासाठी लोकमान्य टिळक यांनी जेव्हा जिल्ह्य़ाचा दौरा केला तेव्हा त्यांची पनवेल, कल्याणसह १० मार्च १९१८ रोजी भिवंडीला जाहीर सभा झाली. त्या सभेत त्यांना पाच हजारांची थैली देण्यात आली, तेव्हा त्यांच्यासोबत तात्यासाहेब केळकर व धोंडोपंत विद्वांस आणि अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अलीसाहेब फक्की होते. सन १९२० मध्ये खिलापत चळवळीच्या निमित्ताने शौकत अली व महंमद अली यांनी भिवंडी शहरास भेट दिली. शहराच्या मध्यभागी जुम्मा मशिदीसमोर ही सभा झाली. त्या वेळचे नगराध्यक्ष माधवराव ताम्हाणे यांच्या हस्ते अली बंधूंना मानपत्रही देण्यात आले. खिलापत चळवळीच्या निमित्ताने हिंदू-मुसलमान ऐक्याचे एक अभूतपूर्व दर्शन भिवंडीत घडले. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात भिवंडीतील स्वातंत्र्यसैनिकांचा सहभाग खूप मोठा आहे. श्री. वासुदेव त्रिंबक भावे, श्री. परशुराम शंकर पुण्यर्थी, श्री. पुरुषोत्तम बळीराम मुंढे, श्री. गजानन भिवा तेरडे, श्री. चंद्रकांत नारायण सुतार, श्री. मुकुंद मराठे, श्री. जगन्नाथ भिडे, श्रीमती इंदुमती शिवराम भिडे, श्रीमती आशा (सोनू), श्रीमती यमू लेले, श्री. मोहन कारवा, श्री. पूनमचंद्र हिरालाल, श्री. ठक्कर गोवर्धनदास द्वारकादास, श्री. झुंबरलाल कलंत्री, श्री. गुलाम मुस्तफा फकी, श्री. अकबर फकी, श्री. कमाल मिगन मोमिन अशा ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांची भारताला स्वातंत्र्य होईपर्यंत भली मोठी यादी होईल. विविध थरांतील, विविध जाती-धर्मातील असंख्य स्त्री-पुरुषांच्या त्यागावर भारताचे स्वातंत्र्य उभे आहे, हे भिवंडीतील स्वातंत्र्यसैनिकांनी दाखवून दिले आहे. १९२३ ला भिवंडीत वीज आली आणि १९२६ मध्ये भिवंडीतील थोर उद्योगपती कै. जी. जी. ऊर्फ दादासाहेब दांडेकर यांच्या प्रयत्नाने पहिले थर्मल पॉवर स्टेशन सुरू झाले आणि १९२७ साली पैगंबरवासी खानसाहेब समदशेठ यांनी भिवंडीत पहिला यंत्रमाग आणला. त्यामुळे भिवंडीतील यंत्रमागाचा जनक असा त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख होतो. कै. दादासाहेब दांडेकर व पै. खानसाहेब समदशेठ या दोन द्रष्टय़ा पुरुषांनी भिवंडीला आधुनिक औद्योगिक नगरी बनविणारे शिल्पकार म्हणून स्वत:चे नाव भिवंडीच्या इतिहासात कायम कोरून ठेवले आहे. हाकेच्या अंतरावर असलेली मुंबईची जागतिक बाजारपेठ भिवंडीच्या औद्योगिक विकासाला साहाय्यभूत ठरली. गेल्या ६० वर्षांत आधुनिक पॉवरलूमद्वारे सुती कपडय़ांसह सिल्क, विसकोस व सिंथेटिक अशा कृत्रिम धाग्यांपासून बनविलेल्या कपडय़ाला प्रचंड मागणी आल्यावर भिवंडीचा चेहरामोहरा झपाटय़ाने बदलू लागला. जुने यंत्रमाग जाऊन ऑटोमॅटिक जापनीज मशीन्स आल्या. डॉबी लावलेल्या ड्रॉपबॉक्स किंवा जेकॉर्ड पद्धतीचे लूम्स आले. यार्न बनविणाऱ्या सायझिंग, वायंडिंग मशीन आल्या, ड्रॉइंग, प्रिंटिंग इत्यादी प्रक्रिया भिवंडीतच होऊ लागल्या. गोडाऊन ट्रान्स्पोर्ट कंपन्या आणि जी. जी. दांडेकर उद्योग समूह व अरिहंत इंडस्ट्रीजसारखे अनेक उद्योग समूहांनी भिवंडीची आर्थिक भरभराट होऊ लागली आणि त्याचबरोबर सामाजिक जागृती, सांस्कृतिक व शैक्षणिक प्रगतीही होऊ लागली. ६ मार्च १८६३ साली सार्वजनिक वाचनालय सुरू झाले आणि पुढच्या वर्षी १० ऑक्टोबर १८६४ रोजी भिवंडी-निजामपूर नगरपालिकेची स्थापना झाली. इंग्रजांनी अँग्लो-उर्दू (रईस हायस्कूल) शाळा सुरू केल्यावर १९३३ साली नवभारत विद्यालय या इंग्रजी शाळेची स्थापना झाली. तिचेच रूपांतर पुढे प. रा. विद्यालयात झाले. भिवंडी नगरपालिकेचे पद्मश्री अण्णाभाऊ जाधव यांनी हरिजन गिरिजन उन्नती मंडळाचे १९६६ साली आर्ट्स, सायन्स, कॉमर्स महाविद्यालयासारखी पुढे मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, गुजराती माध्यमांच्या अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्था उभ्या राहिल्या. भिवंडी नगरपालिकेचे आंबेडकर वाचनालय, पद्मानगरचे जयभारत वाचनालय, विवेकानंद वाचनालय, कामतकर इत्यादी वाचक चळवळी, सिनेमागृह, वऱ्हाळ देवस्थान आणि तलाव यांसारखी रमणीय स्थळे म्हणजे भिवंडी शहराची शान आहे. या सर्व गोष्टींमुळे भिवंडीत एकात्मता, सामंजस्याची मेढ रोवली गेली आणि त्याची पाळेमुळेही खोलवर रुजली. इतकी की दोन दंगली पचवून काही घडले नाही इतक्या शांतपणे भिवंडी शहर नव्या उमेदीने भविष्याकडे झेपावत आहे.