भाईंदरमध्ये चारवर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तीन संशियतांना अटक केली आहे. चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती.  एका जणाने तिची बलात्कार करुन हत्या केली तर त्याच्या दोन मित्रांनी त्याला पुरावा नष्ट करण्यास मदत केली. त्यामुळे त्यांना देखील अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.  ९ जानेवारी रोजी मुलगी हरवल्याची तक्रार तिच्या पालकांनी नवाघर पोलीस स्थानकात दाखल केली होती. त्यानंतर मुलीचा शोध घेण्यास सुरुवात झाली होती.

१२ जानेवारी रोजी आझाद नगर भागातील झोपडपट्टीजवळ त्या छोट्या मुलीचा मृतदेह जमिनीत पुरुन ठेवण्यात आला होता. हे कृत्य तिच्या कुटुंबियांच्या ओळखीच्या व्यक्तीने केले आहे असा संशय होता. त्यानुसार आम्ही तपास सुरू केला. त्या आधारावरच एका संशियतास ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर, चौकशीमध्ये पुढील धागेदोरे मिळाले. पोलिसांनी २४ वर्षीय तरुणाला या प्रकरणात अटक केली आहे. त्याने आपण मुलीची हत्या केली असल्याचे कबूल केले आहे असे पोलिसांनी म्हटले. जेव्हा हा तरुण तिची हत्या करीत होता तेव्हा त्याचे दोन मित्र तिला पुरण्यासाठी खड्डा खणत होते अशी माहिती पोलिसांनी दिली.

पीडित मुलगी आपल्या घराबाहेर खेळत होती. तेव्हा तिचे अपहरण केले गेले होते. तेथून अपहरण करुन मुलीला आझाद नगर येथे नेण्यात आले आणि तेथेच त्याने तिच्यावर हे कृत्य केले. त्यानंतर पाडितेची हत्या करण्यात आली. त्याच्या मित्रांनी खड्डा खणलेला होता त्यातच तिला पुरण्यात आले. १२ तारखेला जेव्हा एका मांजरीने ती जागा उकरुन काढली तेव्हा आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना संशय आला आणि त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांना तिचा मृतदेह मिळाला आणि त्यांनी तो शल्यचिकित्सेसाठी तो पाठवला. तिच्या शरिरावर जखमा होत्या आणि डोक्याला मार लागलेला होता असे पोलिसांनी सांगितले.

संशयाच्या आधारावर पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याने चौकशीदरम्यान आपण गुन्हा केला असल्याचे कबूल केले असे पोलिसांनी म्हटले. तसेच हा गुन्हा लपविण्यासाठी आपल्या मित्रांनी आपणास मदत केली असल्याचीही कबुली त्याने दिली. या २४ वर्षीय संशयिताची आणि पीडितेच्या कुटुंबाची ओळख होती.