|| सागर नरेकर सिंधी बांधवांकडून मोठी मागणी उल्हासनगर : दिवाळीच्या सणात सिंधी बांधव आपल्या दुकान, व्यापार उद्योगाच्या जागेची प्रतीकात्मक पूजा करत असतात. त्यासाठी माती, काठी, रंग आणि कागदाचा वापर करून हटडी तयार केली जाते. यंदा करोनाचे संकट, अधिक मास यामुळे या हटडीच्या निर्मितीला विलंब झाला होता. असे असले तरी दिवाळीचा सण जवळ आल्याने उल्हासनगर शहरात या हटडीच्या निर्मितीला वेग आला आहे. उल्हासनगर शहर जिल्ह्यातील एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. सिंधी बांधव हेही या शहराची स्वतंत्र ओळख आहे. व्यापारी असलेल्या सिंधी समुदायात लक्ष्मीपुजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.उल्हासनगर शहरात सुमारे साडेपाच लाख लोकसंख्या असून त्यात तीन लाखांच्या जवळपास सिंधी बांधवांची संख्या आहे. शहरातील वाघारी समाजाचे लोक या हटडीची निर्मिती करतात. दिवाळीच्या १५ ते २० दिवस आधी गुजरातमधल्या विविध भागांतून हे वाघारी बांधव शहरात येऊन रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत हटडी निर्मितीची कामे सुरू करतात. यंदा करोनाच्या संकटात शहरात गुजरातमधून येणाऱ्यांची संख्या घटल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहरात असलेल्या पवई, गोल मैदान भागात वास्तव्यास असलेल्या वाघारी समाजाकडून सध्या हटडीच्या निर्मितीचे काम वेगाने केले जाते आहे. शहरात ५० ते ६० हजार हटडी तयार केल्या जातात. यांची प्रति दोन हटडी ५० रुपये या अल्प दराने विक्री केली जाते. त्यामुळे मेहनत करूनही या वाघारी समाजाच्या हाती ठोस रक्कम लागत नाही. हटडी म्हणजे प्रतीकात्मक दुकान सिंधी बांधव लक्ष्मीपुजनाच्या दिवशी हटडीची पूजा करतात. हटडी म्हणजे एक प्रतीकात्मक दुकान. मातीच्या गोलाकार चकतीवर त्रिकोणात्मक तीन बांबूच्या काड्या रोवून त्याला रंगीत कागदांची सजावट केली जाते. चकती पांढऱ्या रंगाने रंगवली जाते. या प्रतीकात्मक दुकानाची सिंधी बांधव मनोभावे पूजा करतात. यातून व्यवसायवृद्धी होत असते अशी सिंधी बांधवांची धारणा आहे. सेवा म्हणूनच निर्मिती आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगरात स्थायिक आहोत. किती वर्षांपासून हा व्यवसाय करतो हे सांगता येणार नाही. पत्नीसह दरवर्षी हटडी निर्मिती आणि विक्री करतो, असे सतरा सेक्शन परिसरातील प्रेम रापुचा सांगतात. यातून आर्थिक उत्पन्न कमीच मिळते, हटडीचे दरही गेल्या काही वर्षात वाढलेले नाहीत. त्यामुळे सेवा म्हणूनच निर्मिती करत असल्याचे रापुचा सांगतात.