कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील गटारांमधील गाळ काढण्याची कामे ठेकेदारांनी योग्य पद्धतीने न केल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. तसेच काही ठिकाणी गटारांमधील काढलेला गाळ गटाराच्या कडेला काढून ठेवण्यात आला. हा गाळ उचलला न गेल्याने पावसामुळे तो गाळ पुन्हा गटारात वाहून गेल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

या ढिसाळ कामांमुळे अनेक रहिवाशांनी पालिका अधिकारी, ठेकेदारांच्या निष्क्रियतेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. काही नगरसेवकांनी प्रभागांमधील गटार सफाईची कामे पालिकेकडून करण्यात आली नाहीत अशा तक्रारी केल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी गटारे, नालेसफाईची कोटय़वधी रुपयांची कामे पालिकेकडून ठेकेदारांना देण्यात येतात.

नगरसेवक, अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी फक्त मोठय़ा दर्शनी भागातील नाल्यांची सफाई केली जाते. उर्वरित नाले पावसाळा सुरू झाला की सफाई न करता, नाल्यात पाणी साचल्याचे कारण देत साफ केले जात नसल्याचे एका माहीतगाराने सांगितले.

’कल्याण पूर्व, डोंबिवली पश्चिम भागात गटाराच्या कडेला चिखलाचे ढीग हे दृश्य अधिक प्रमाणात दिसत आहे.

’स्थानिक नगरसेवक ‘समाधानी’ असल्याने तो गाळ, गटार या विषयाकडे लक्ष देत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

’वर्षांनुर्वष हा प्रकार सुरू आहे. तरीही पालिका प्रशासन ठेकेदारांवर कारवाई का करत नाही. नगरसेवक या विषयावर मौन बाळगून का बसतात, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

’डोंबिवली पश्चिमेत दीनदयाळ रस्त्यावर भर पावसात गटार बांधण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यात बांधलेले हे गटार सततच्या पाण्याच्या प्रवाहामुळे टिकेल का, असा सवाल स्थानिकांनी विचारला आहे.