‘चकमक फेम’ अधिकारी रवींद्र आंग्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आंग्रे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा विधानसभा निवडणुकीपासून सुरू होती. ठाणे शहर मतदारसंघातील भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या घोडबंदर येथील जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
दानवे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उपाय असतील तर वृत्तपत्रातून बोलण्याऐवजी प्रत्यक्ष आमच्यासोबत बैठकीत मांडावेत. अशा उपायांवर चर्चा करून मूळ प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय राजकीय होऊ शकत नाही, यामुळे त्या विषयाला राजकीय वळण देऊ नये.पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले असून सर्वाधिक जागा मिळाल्याने पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेसोबत जायचे का, याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केलेल्या टिकेविषयी पत्रकारांनी त्यांना विचारले असता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या राजकीय विषय होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

प्रवेशाची चर्चा रंगली
आमदार संजय केळकर यांच्या घोडबंदर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमादरम्यान चकमकफेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेले अनेक महिने ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा शहरात रंगली होती.