दरवर्षीप्रमाणे यंदाही नाले सफाई केल्याचे प्रशासनाचे दावे रविवारी पडलेल्या पहिल्याच पावसाने फोल ठरविले आहेत. यंदा नाले सफाईसाठी एक कोटी ८५ लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र अजूनही अनेक नाले तुंबलेल्या अवस्थेतच आहेत. त्यामुळे हा सर्व खर्चही गाळात जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रविवारी कल्याण शहरात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. महापालिका क्षेत्रात ५१ किलोमिटरचे एकूण ५२ नाले आहेत. त्यामध्ये एकूण १३ नाले हे मोठे आहेत. महापालिकेचे एकूण सात प्रभाग क्षेत्र असून प्रत्येक प्रभाग क्षेत्रांतर्गत नाले सफाईचे कंत्राट दिले जाते. सध्या २७ गावांमुळे ‘ई’ या आणखी एका प्रभागाची यात भर पडली आहे. यामुळे या नाल्यांच्या संख्येत आणखी भर पडणार आहे.कल्याण पश्चिमेतील महालक्ष्मी हॉटेल येथील नाल्याची सफाई करण्यात आली. तसेच विठ्ठलवाडी नाल्याची सफाई सुरूआहे. नाल्यातून काढण्यात येणारा गाळ हा नाल्यातच एका बाजूला साठविण्यात येत आहे. अशाच पद्धतीने शहरातील इतर नाल्यांचीही सफाई केली जात आहे. त्यामुळे पावसात हा गाळ पुन्हा नाल्यात जाऊन नाले तुंबण्याची शक्यता आहे. पावसाळा तोंडावर आल्याने घाईमध्ये या नाल्यांची सफाई केली जात आहे. अत्यंत घाईघाईने ही कामे उरकण्यात येत आहेत. प्रशासनाकडून नाले सफाईचे कितीही दावे केले जात असले तरी वस्तुस्थिती पहाता त्यांचे दावे फोल ठरल्याचे चित्र दिसून आले आहे. महासभा, स्थायी समितीमध्ये असमाधानकारक नाले सफाईवर लोकप्रतिनिधींकडून नेहमीच टीका केली जाते. नाले सफाई कागदावर केली जात असून, काम न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका, त्यांची बिले थांबवा, कारवाई करा असे ठराव केले जातात. मात्र अंमलबजावणी अभावी हे ठरावही केवळ कागदोपत्रीच उरतात. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी शहरातील नाले सफाई कामाची पहाणी केली. ८० टक्के नाल्यांची सफाई झाली असून सर्व नाले चांगल्या प्रकारे साफ झाल्याचे त्यांनी सांगितले. येत्या पावसाळ्यात ही सफाई कशा पद्धतीने झाली आहे हे लवकरच स्पष्ट होईल.