ठाणे येथील लुईसवाडी परिसरात एका कारच्या इंजिनमध्ये अचानकपणे आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली असून या आगीत कार जळून खाक झाली. या घटनेत कारचालक मात्र सुदैवाने बचावला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरच ही घटना घडल्यामुळे या मार्गावर सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती.

कळवा परिसरात राहणारे चंदन नवनीत चतुर्वेदी यांची ही कार आहे. मंगळवारी रात्री ते कारने मुंबईहून घरी परतत होते. त्या वेळी कारमध्ये ते एकटेच होते. मुंबई-नाशिक महामार्गाने कळव्याच्या दिशेने कार घेऊन जात असतानाच नितीन कंपनी येथील लुईसवाडी भागात कारच्या इंजिनने अचानकपणे पेट घेतला. ही बाब लक्षात येताच ते कारमधून बाहेर पडले. रस्त्याच्या मधोमधच कारला आग लागल्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.