तालुक्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे भातसा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असल्याने भातसा धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून भातसा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याआधी मुंबई महानगरीला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील तानसा आणि मोडकसागर ही धरणे एक दुसऱ्या दिवसाच्या अंतराने ओसंडून वाहू लागली होती. शुक्रवारी शहापूर तालुक्यात ६६.६ मिमी. पावसाची नोंद झाली असून भातसा धरणाची पाणीपातळी १३९.६८ मी. इतकी वाढल्यानंतर आज शुक्रवारी दुपारी १.३० वाजता भातसा धरणाचे ५ वक्रीदरवाजे ०.२५ मी. अंतराइतके वर उघडण्यात आले आहेत. त्यांतून १०७.७५ घनमीटर प्रतीसेकंद अर्थात ३ हजार ८०५.१९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तालुक्यात पावसाचा जोर अद्यापी कायम असून भातसा नदीला पुर आला आहे. त्यातच धरणाच्या पाण्याचाही समावेश झाल्याने भातसा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता ओळखून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भातसा नदीवरील सापगांव पूल पाण्याखाली जाण्याची भीती असल्याने शहापूर - मुरबाड या मुख्य रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांनाही दक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.