|| कल्पेश भोईर ब्रिटिशांच्या जोखडातून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. त्यामुळे देशभरात हा दिवस ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केला जाऊ लागला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून ओळखला जातो. २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली. म्हणून राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला होता. भारताच्या संविधानाला संविधान समितीव्दारे तयार करण्यात आले होते. हे संविधान तयार करण्याकरिता तब्बल २ वर्षे ११ महिने १८ दिवस इतका कालावधी लागला होता व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संविधानाचा मसुदा तयार करण्याकरिता २९ ऑगस्ट १९४७ या दिवशी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती. आपल्याला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले हे तर माहीतच आहे, परंतु २६ जानेवारी १९५० रोजी देशाचे संविधान स्वीकृत केल्यानंतर भारत देश सार्वभौम, लोकतंत्र आणि गणराज्य बनला म्हणूनच प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आज लोकशाहीच्या दृष्टीने भारत देशाला खूप महत्त्व आहे. जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ख्याती आहे. यंदाचा भारताचा ७१ वा प्रजासत्ताक दिन. १९५० साली भारताने संविधान अमलात आणून लोकशाहीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. म्हणूनच या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून मानवंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते व देशाप्रती आदरव्यक्त केला जातो. देशाला मिळालेले स्वतंत्र हे काही सहजासहजी मिळालेलं नाही त्यासाठी अनेक समाजसुधारकांनी लढा दिला व वेळप्रसंगी आपल्या प्राणाची आहुतीही दिली व खूप मोठा संघर्ष केला म्हणूनच आज हा अतुल्य भारत उभा आहे. म्हणूनच आपण देशात मुक्तपणे राहू शकतो. देशाच्या जडणघडणीत देशाने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. आज देशाची वाटचाल ही प्रगतीच्या दिशेने सुरू आहे. तसेच आजही देशात लोकशाही मार्गाने लढा सुरू आहे. स्वतंत्र व प्रजासत्ताक झाल्यानंतरच्या प्रवासात देशाने खूप सारे चांगले-वाईट क्षण अनुभवले आहेत. तरीदेखील आज देश प्रगतीच्या वाटेवर कायम आहे. आज देश संशोधन, कृषीक्षेत्र, उद्योगधंदे, आरोग्य, शिक्षण, डिजिटल क्रांती, आर्थिक वाटचाल, सुरक्षा, तंत्रज्ञान शिक्षण, कला, क्रीडा अशा अनेक प्रकारच्या क्षेत्रात देशाची उत्तम कामगिरी सुरू आहे. विकासाच्या दृष्टीने देशाने मोठी भरारी घेतली आहे. म्हणूनच आपण तिरंग्याला व अतुलनीय कामगिरी केलेल्या सर्वानाच मानवंदना देण्यासाठी जात असतो. आज भारत देश वैज्ञानिक दृष्टीने पुढे गेला आहे. पण अजूनही सामाजिक विचारांनी मागे आहे. म्हणूनच समाजात आजही जाती-भेद, एकमेकांबद्दल मतभेद कायम आहेत. जर भारताची खऱ्या अर्थाने भविष्याची वाटचाल चांगली करायची असेल तर लोकशाहीने दिलेल्या मूल्यांची जपणूक करायला हवी व सकारात्मक भावनेने विचार करून लोकशाहीबद्दल अभिमान बाळगायला हवा. आजही देशावर कितीही अडचणी व संकटे आली तरीही त्यावर मात करून समृद्ध भारत उभा आहे.. होय, म्हणूनच माझा भारतीय लोकशाहीला सलाम.. उत्सव तीन रंगांचा दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था अशा विविध ठिकाणी ध्वजारोहण करून, रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रभात फेरी, एनसीसी आणि स्काऊट गाइडच्या विद्यार्थ्यांचे संचलन, पथनाटय़ अशा विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते, तसेच भारताच्या राजधानीतही याचा मोठा उत्सव साजरा केला जातो. त्या ठिकाणी संचलन आयोजित केले जाते. संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या आधी अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. तर देशाचे पंतप्रधानही यावेळी यानिमित्ताने भारतीयांना आपल्या भाषणातून संबोधित करतात. तर सेनादल, नौदल आणि वायुदल हेसुद्धा विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून अनोखी मानवंदना दिली जाते. तर भारताची संस्कृती आणि त्यातील विविधता सादर करण्यासाठी विविध राज्यांतील चित्ररथही सहभागी होतात. या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते. केवळ उत्साहामध्ये दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही. कारण आपण या देशाचे नागरिक असून देशाने मला काय दिले यापेक्षा मी या देशाला काय दिले या भावनेतून देशाप्रती प्रत्येक भारतीयाने या महत्त्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतीज्ञा केलीच पाहिजे आणि त्यानुसार वर्तणूक केली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना, राष्ट्र प्रेम अधिक उजळून निघेल.