नायगाव पूर्व जूचंद्र येथील सानेगुरुजी मार्ग परिसरात मागील वर्षभरापासून लोंबकळत असलेल्या विद्युत वाहक तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन आगीच्या ठिणग्या बाहेर पडत आहेत. यामुळे अधूनमधून येथील वीजपुरवठा खंडित होत आहे. तर दुसरीकडे या प्रकारामुळे दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. नुकताच पुन्हा एकदा या भागातील लोंबकळत असलेली विद्युत वाहक तार तुटून खाली पडल्याची घटना घडली आहे. नायगाव पूर्वेतील जूचंद्र येथील सानेगुरुजी परिसर आहे. या भागात महावितरणतर्फे वीजपुरवठा करण्यासाठी विद्युत पोल उभारण्यात आले असून त्यावर विद्युत वाहक तारा जोडून नागरिकांना वीजजोडण्या दिल्या आहेत. मात्र सध्या या तारांची संख्या जास्त प्रमाणात झाल्याने त्या ठिकाणी गुंता तयार होऊन या विद्युत वाहक तारा लोंबकळत आहे. या लोंबकळत असलेल्या विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन आगीच्या ठिणग्या बाहेर पडत आहेत. असा प्रकार या भागात सातत्याने सुरू असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. सोमवारी सकाळच्या सुमाराससुद्धा येथील विद्युत वाहक तारांचा स्पर्श होऊन विद्युत वाहक तार तुटून खाली पडल्याची घटना घडली होती. यामुळे येथून ये-जा करताना नागरिकांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. गावात जाणारा मार्ग असल्याने या रस्त्यावरून अनेक नागरिक ये-जा करतात, तर आजूबाजूची लहान मुले ही याच ठिकाणी खेळत असतात. जर ही विद्युत वाहक तार एखाद्याच्या अंगावर पडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी वेळीच प्रसंगावधान राखत त्याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दिली. तर पुढे धोका असल्याचे दर्शविण्यासाठी तात्पुरता स्वरूपात वाट बंद केली होती. सानेगुरुजी मार्ग या परिसरात मागील वर्षांभरापासून विद्युत वाहक तारांचा स्पर्श होऊन ठिणग्या बाहेर पडण्याचा प्रकार सुरू आहे. याची पूर्ण कल्पना महावितरण विभागाला आहे. महावितरण विभागाचे कर्मचारी येऊन केवळ याची तात्पुरता स्वरूपात दुरुस्ती केली जाते. परंतु पुन्हा समस्या जैसे थे असल्याने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तकलादू स्वरूपाच्या असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. ज्या भागात विद्युत वाहक तारांना स्पर्श होतोय अशा ठिकाणी संबंधित विभागातील अधिकारी यांना वाहिन्यावर स्पेसर्स टाकून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. - राजेश चौहान, अधीक्षक अभियंता महावितरण वसई.