रमेश पाटील

आगीवर नियंत्रण मिळवणाऱ्या साधनसामग्रीचा अभाव; वन कर्मचारी हतबल

वाढत्या वणव्यामुळे वाडा तालुक्यातील वनसंपदा नष्ट होत आहे. जंगलाला आग लागल्यानंतर ती आटोक्यात आणणारी पुरेशी यंत्रणा वनविभागाकडे नसल्याने कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत आहे. वन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवणारी साधनसामग्री वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.

वाडा तालुका हा जसा ‘वाडा कोलम’ तांदळासाठी ओळखला जातो, तसा तो येथील वनसंपदेनेही बहरलेला आहे. एकेकाळी वाडय़ातील साग लाकडाची इटाली देशात बोटी बांधण्यासाठी निर्यात केली जात असे. सागाचे लाकूड इमारती व फर्निचरसाठी प्रसिद्ध असून वाडा तालुका साग या वृक्षासाठी प्रसिद्ध आहे. मात्र आता वाढती जंगलतोड आणि मोठय़ा प्रमाणात लागत असलेल्या वणव्यांमुळे येथील वनसंपत्ती नष्ट होत आहे.

वाडा तालुक्याला २४ हजार हेक्टर वनक्षेत्र लाभले आहे. या वनक्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी वाडा पूर्व, वाडा पश्चिम व कंचाड अशी तीन परिक्षेत्रे आहेत. या परिक्षेत्रात पुरेसे कर्मचारी आणि पुरेशी यंत्रसामग्री नाही. वनपालच्या एकूण १६ जागांपैकी नऊ जागा रिक्त आहेत. जंगलाला आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी या ठिकाणी फक्त सहा ब्लोअर मशीन (आग प्रतिबंधक यंत्र) असून त्या आग विझवण्यासाठी अपुऱ्या पडत आहेत. यामुळे येथील वन कर्मचारी वाढत्या वणव्यांपुढे हतबल झालेले दिसतात. जंगलाला लागलेल्या काही आगी मानवनिर्मित आहेत. शिकार करणाऱ्यांकडून आगी लागवल्या जातात. शेतकऱ्यांकडूनही अनेकदा आग लावली जाते.

दोनच यंत्रे

जंगलाला आग लागल्यानंतर ब्लोअर मशीनच्या साहाय्याने ती विझवण्यात येते. एक ब्लोअर मशीन १० ते १५ कर्मचाऱ्यांचे काम करते. मात्र वाडय़ात वन विभागाकडे केवळ दोनच यंत्रे असून अधिक यंत्रांची मागणी करण्यात आली आहे.

स्थानिक रहिवाशांनी, वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी, वनपट्टेधारकांनी जंगलात आग लागल्याची माहिती वेळीच वन कर्मचाऱ्यांना देऊन सहकार्य करावे.

– सुरेंद्र काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी

जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी वन विभागाने लोकसहभाग आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वतंत्र पथक बनवणे गरजेचे आहे.

– प्रल्हाद सावंत, सामाजिक कार्यकर्ता, वाडा