महाविद्यालयीन युवकांना आपले विचार मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची सुरुवात झाली असून शनिवारी ठाणे केंद्राची प्राथमिक फेरी ज्ञानसाधना विद्यानिकेतनच्या सभागृहात सकाळी १० वाजता रंगणार आहे. या वर्षी ठाणे विभागामध्ये ३५ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने नटलेल्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात झाली आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील घडामोडींबाबत तरुणाईला आपल्या शैलीत व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या या स्पर्धेला राज्यभरातील महाविद्यालयातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेच्या या वर्षीच्या पर्वाची सुरुवात झाली आहे.
‘जनता सहकारी बँक’ आणि ‘तन्वी हर्बल प्रोडक्ट्स’ या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. ‘सिंहगड इन्स्टिटय़ूट’, ‘मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस’, ‘इंडियन ऑइल’, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट’ अर्थात आयसीडी यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे. ‘युनिक अ‍ॅकॅडमी’ आणि ‘स्टडी सर्कल’ या स्पर्धेसाठी नॉलेज पार्टनर आहेत.
मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर आणि अहमदनगर अशा आठ केंद्रांवर तीन टप्प्यांमध्ये ही स्पर्धा होत आहे. प्राथमिक फेरीतून निवडण्यात आलेले वक्ते विभागीय अंतिम फेरीत दाखल होतील. ही फेरी राज्यभरात २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.
आठही विभागांतून निवडण्यात आलेल्या वक्त्यांची १४ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे महाअंतिम फेरी रंगणार आहे.