एका २६ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये ही घटना घडली. आरोपीने पत्नीचा बुटाच्या लेसने गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह जाळला होता. सुशीला साहेबराव निकाळजे (२५ वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

मृत सुशीलाचे सुरज आनंद खरात यांच्याशी लग्न झाले होते. आरोपी एका केटररसोबत वेटर म्हणून काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूरजला त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. यामुळे दोघांमध्ये अनेकदा भांडण व्हायचे. घटना घडली त्या दिवशीदेखील दोघांमध्ये याच कारणावरून जोरदार भांडण झाले. त्यादरम्यान, आरोपीने बुटाच्या लेसने गळा आवळून पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याने पुरावे मिटवण्यासाठी आणि तपासाची दिशाभूल करण्यासाठी मृत पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतले आणि जाळले.

“आरोपीने रागात हे कृत्य केले आणि क्षणार्धात महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आरोपीने तिला जाळून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून पोलिसांना मृतदेह ओळखण्यास अडचणी येतील शिवाय तिने आत्महत्या केल्याचं भासेल.” एका पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.

२२ ऑगस्ट रोजी घरातून दुर्गंधी येत असल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर या महिलेचा मृतदेह घरातून सापडला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवला तिथे डॉक्टरांनी सांगितले की तिच्या शरीराला आग लावण्यापूर्वी तिचा गळा दाबल्यामुळे मृत्यू झाला होता. यानंतर, शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये खून आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला, ” असं पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपीला अटक केली. आरोपीने त्याचा गुन्हा कबुल केला आहे.