कुटुंबीयांचा आरोप; पोलिसांनी आरोप फेटाळले वसई : नालासोपारा येथे पोलीस चकमकीत मरण पावलेल्या जोगिंदर राणा याला खोटय़ा चकमकीत मारल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी दुपारी जोगिंदर राणा याला चकमकीत ठार केले होते. ही चकमक खोटी होती आणि पोलिसांनी नियोजनबद्धरीत्या त्याची हत्या केल्याचा आरोप त्याच्या भावाने केला आहे. नालासोपारा येथे राहणारा जोगिंदर गोपाल राणा ऊर्फ गोपाल राणा याची सोमवारी नालासोपारा पूर्वेच्या राधानगर येथे पोलीस चकमकीत हत्या करण्यात आली. राणा हा सराईत गुंड होता. त्याच्यावर वांद्रे, खार, सांताक्रूझ, जुहू, कांदिवली आणि अर्नाळा पोलीस ठाण्यात ३७ गुन्हे दाखल होते. त्यात चोरी आणि दरोडय़ाच्या गुन्ह्याचा समावेश होता. त्यातील बहुतांश गुन्ह्यांत तो शिक्षा भोगून आला होता. विरारमधील अर्नाळा पोलीस ठाण्यात त्याच्यावर एक गुन्हा दाखल होता. त्याला खोटय़ा चकमकीत ठार मारल्याचा आरोप जोगिंदर राणा याचा भाऊ सोनू राणा याने केला आहे. जोगिंदर राणाने पोलीस हवालदारावर चाकूने हल्ला केला, असे पोलीस सांगतात. जर माझ्या भावाने चाकूने हल्ला केला तर चाकूला रक्त का लागले नव्हते, असा सवाल सोनू राणा यांनी केला. हल्ल्यात पोलीस हवालदार मनोज चव्हाण जखमी होऊन अतिदक्षता विभागात दाखल असल्याचे पोलीस सांगतात. मात्र तो छायाचित्रात घटनास्थळी उभा आहे, तसेच बुटाची लेस बांधत असताना दिसत आहे, असे सोनू यांनी सांगितले. माझ्या भावाने गुन्हेगारी विश्व सोडले होते आणि तो चालक म्हणून काम करत होता. अर्नाळा येथे त्याच्यावर केवळ एकच गुन्हा दाखल होता. आता या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहे, असे त्यांनी सांगितले. न्यायालयीन चौकशी सुरू पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. जर पोलीस दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. चौकशी सुरू असताना आताच भाष्य करणे योग्य नाही, असे नालासोपारा विभागाचे पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी सांगितले.