अंबरनाथ नगरपालिकेत गणेश देशमुख यांची मुख्याधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. नगरविकास खात्याने गुरुवारी सकाळी काढलेल्या शासन आदेशानुसार मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी कार्यरत असलेले गणेश देशमुख आता अंबरनाथ नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.
अंबरनाथ नगरपालिकेचा अतिरिक्त पदभार सध्या कुळगांव-बदलापूर नगरपालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी देविदास पवार सांभाळत आहेत. अंबरनाथ नगरपालिकेचा कारभार पाहणारे मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी हे २०१० साली बदलापूर नगरपालिकेत मुख्याधिकारी असताना त्यांच्या काळात झालेला टीडीआर घोटाळा सध्या उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोसावी यांच्यावर ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शोध शाखेने गुन्हाही दाखल केला आहे. त्यामुळे गोसावी यांनी येथून सुट्टी घेऊन काढता पाय घेतला होता.