ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे डोंबिवलीत प्रतिपादन अभिनय म्हणजे आभास निर्माण करणे होय, आणि ही क्रिया सर्व प्राणिमात्रांना माहीत आहे. मनुष्य हा दैनंदिन जीवनात अनेकदा अभिनयच करीत असतो, फक्त रंगमंचावर तोच अभिनय करताना गोंधळ उडतो. अभिनय करताना कधीही स्वत:ला विसरायचे नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शक विक्रम गोखले यांनी डोंबिवली येथे केले. वेध अॅक्टिंग अकादमी यांच्या वतीने ‘वेध भेट’ या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याशी गप्पा मैफिलीचे आयोजन येथील सुयोग मंगल कार्यालयात रविवारी करण्यात आले होते. या प्रसंगी आनंद म्हसवेकर, राम कोल्हटकर, भालचंद्र कोल्हटकर, अखिल भारतीय नाटय़ परिषद डोंबिवली शाखेचे अध्यक्ष दिलीप गुजर आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना गोखले म्हणाले, अभिनय क्षेत्रात कलाकारांना काम मिळाले नाही की नैराश्य येते, म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तीसोबत काम करा आणि कामात सातत्य ठेवा, असा सल्ला त्यांनी दिला. दिग्दर्शक, लेखक, अभिनेता कोणतेही क्षेत्र असो एकाग्रता आवश्यक आहे. शारीरिक हालचालींवर नियंत्रण येण्यासाठी, अभिनयासाठी योग, व्यायाम करणे गरजेचे आहे. खेडय़ापाडय़ात जशी एका मैलावर भाषा बदलते तसेच पाच ते दहा वर्षांनी प्रेक्षकांची अभिरुची बदललेली असते. तुमच्या अभिनयात वेगवेगळे प्रयोग, त्यात सातत्य आणि नावीन्य आणण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.