सप्तसूर आणि गाण्याचे नाते जणू आपुलकीच्या बंधनाची साद घालतात त्यामुळे कलाकार आणि रसिक यांचे वर्षांनुवर्षांचे ऋणानुबंध असल्याचा भास अगदी सहज होऊ लागतो आणि याच सप्तसुरांच्या लहरींमध्ये रसिकांच्या मनाच्या ताराही अगदी सहज मिसळतात. शांता शेळके आणि मंगेश पाडगांवकरांच्या शब्दातल्या आठवणी येथे जागवण्याचा कार्यक्रम रविवारी सायंकाळी सिद्धकला संगीत अकादमीच्या वतीने सहयोग मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. ठाणेकर रसिक नेहमीच चांगले कलाकार घडविण्यासाठी पुढाकार घेतात आणि नवोदित कलाकार असले तरीही प्रत्येक गाण्याला आवर्जून दाद देऊन कालाकारांमधील प्रतिभा अधिक प्रगल्भ व्हावी यासाठी नेहमीच प्रोत्साहन देतात. त्यामुळे कलाकार घडतो याचा प्रत्यय गायिका संपदा गोस्वामी यांच्या गाण्यातून सातत्याने जाणवत होता.सहयोग मंदिर येथूनच आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या संपदा गोस्वामी यांनी त्यांच्या प्रत्येक गाण्यातून ठाणेकरांचे मन रिझवले. प्रेमाची पावती प्रेमानेच द्यावी असे असले तरी संपदाने मात्र ही पावती आपल्या आवाजातून रसिकांना दिली. गाणी कानावर पडताक्षणी त्या गाण्यातील शब्द रसिकांपर्यंत पोहचणे अतिशय गरजेचे असते आणि म्हणूनच लयबद्ध,अर्थपूर्ण आणि सोप्या शब्दांत कविता लिहिण्याच्या शांता शेळके आणि मंगेश पाडगांवकर यांचा कसा हातखंड होता हे प्रभंजन मराठे यांनी त्यांच्या आवाजातून रसिकांपर्यंत अगदी अलगद पोहचवले. तर हृदयाला भिडणाऱ्या अनेक गाण्यांना रमेश राणे यांनी परिपूर्ण न्याय दिला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या शब्दरचनेमुळे मनाला नेहमीच उभारी मिळते. तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे रे, या जगण्यावर या मरणावर शतदा प्रेम करावे, ही चाल तुरुतुरु, शुक्रतारा मंदवारा, रेशमाच्या रेघांनी, पप्पा सांगा कोणाचे या गीतांनी गेली अनेक वर्षे रसिकप्रेक्षकांवर जादू केली आहे.त्यामुळे याच गीतांनी सभागृहात उपस्थित असणाऱ्या ठाणेकर रसिकांना खिळवून ठेवले.गायक आणि वाद्यांचा घनिष्ठ संबंध असतो आणि हाच संबंध टिकवून ठेवण्यासाठी सुभाष मालेगावकर यांनी उत्कृष्ट संगीत संयोजन केले आणि कार्यक्रमाची रंगत वाढवली. सुशांत बर्वे यांनी लावणीसाठी ढोलकी वाजवून सभागृहात वतावरण निर्मिती केली आणि रसिक प्रेक्षकांनी त्यांच्यावर शिटय़ांचा वर्षांव केला. रसिकांना तर स्वररागिणी अवतरली असल्याचाच भास होत होता.