शिवसेना आणि भाजपमध्ये वारंवार होत असलेल्या वादांचे पडसाद अंबरनाथ व बदलापुरात उमटू लागले आहेत. बदलापूर नगरपालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना व भाजपात रोज नव्याने वादाच्या ठिणग्या पडत आहेत.
दरम्यान, आमदार कथोरे यांनी एकहाती बदलापूरची सत्ता द्या, परिवर्तन घडवू असे सांगत बदलापूरकरांच्या विश्वासाला  तडा जाऊ देणार नाही, असे आवाहन उपस्थितांना केल्याने भाजप बदलापुरात स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे  स्पष्ट संकेत मिळाले आहेत. बदलापूरमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुवर्ण जयंती  योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या २० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे अनावरण करण्यात आले. या वेळी आमदार किसन कथोरे, भाजपचे नगरसेवक आणि प्राधिकरणचे उपअभियंता एम. एस. बसनगार उपस्थित होते. परंतु बदलापूर शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्षा उषा म्हात्रे यांची अनुपस्थिती होती. याबाबत म्हात्रे यांच्याकडे विचारले असता त्यांना निमंत्रणच दिले गेले नसल्याचे कळले. उषा म्हात्रे या सेनेच्या नगरध्यक्षा आहेत. त्यामुळे भाजपने त्यांना डावलल्याची चर्चा होत आहे. तसेच या उद्घाटनाच्या काही दिवस आधीच सेनेच्या आदित्य ठाकरे यांनी या पाण्याच्या टाकीला भेट देत पाहणी केली होती. त्यामुळेच भाजपने या टाकीचे आठवडाभरात उद्घाटन करत नगराध्यक्षांना लांब ठेवल्याचे बोलले जात आहे. यावर म्हात्रे यांनी भाजप नेते एकतर्फी कारभार करत असल्याचा आरोप केला. शासकीय कार्यक्रम नसल्याने कोणालाही निमंत्रण नव्हते, असे बसनगार म्हणाले.