कल्याणमधील सर्वाधिक वर्दळीच्या पत्रीपूल ते गुरुदेव हॉटेल दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा दाटीवाटीने टपऱ्या उभारून काही रहिवाशांनी व्यवसाय सुरु केले होते. कल्याण बाजार समिती ते गोविंद करसन चौकादरम्यान रस्ते अडवून २४ बेकायदा टपऱ्या उभारण्यात आल्या होत्या. पालिकेच्या ‘क' प्रभाग विभागाने या सगळ्या टपऱ्या बुधवारी जमीनदोस्त केल्या. पत्रीपुलावरुन शिवाजी चौकाकडे जाताना वाहन चालकांना या टपऱ्यांचा सर्वाधिक अडथळा होता.पावसाळा सुरु झाल्यानंतर शाळेच्या बस रस्त्यावर धावतील. त्यामुळे वाहतुकीत आणखी भर पडेल. रस्ते प्रशस्त असावेत व वाहतुकीला कोणताही अडथळा येता कामा नये म्हणून आयुक्त ई. रवींद्रन यांनी या बेकायदा टपऱ्या जमीनदोस्त करण्याचे आदेश ‘क' प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांना दिले होते. वानखेडे यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात २६ टपऱ्या जमीनदोस्त केल्या. शिवाजी चौक ते मुरबाड रस्ता रस्तारुंदीकरणाने शिवाजी चौकातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. भगवानदास संकुलावर हातोडा शिवाजी चौकातील रस्तारुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या भगवानदास मॅन्शन या निवासी व व्यापारी संकुलावर पालिकेच्या पथकाने हातोडा चालविला. जानेवारीमध्ये शिवाजी चौक ते मुरबाड रस्ता रुंदीकरण करताना, भगवानदान संकुलाचे व्यापारी गाळे व निवासी सदनिका तोडण्याची कारवाई करण्यात आली. परंतु, या संकुलातील गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेऊन पालिकेच्या कारवाईला स्थगिती मिळविली होती. न्यायालयीन अडथळा दूर होताच, पालिकेच्या पथकाने भगवानदान संकुलाचे सर्व गाळे जमीनदोस्त केले. ही कारवाई पाहण्यासाठी बघ्यांनी खूप गर्दी केली होती. स्थगिती असल्याने कारवाई होणार नाही म्हणून असे गाळेधारकांना वाटत होते. त्यात कारवाई झाल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहे.