शेकडो लिटर पाण्याची रोज राजरोस चोरी; प्रशासनाचे दुर्लक्ष वाढत्या प्रदूषणामुळे उल्हास नदीचा नाला होतो की काय अशी भीती पर्यावरणप्रेमींमध्ये व्यक्त होत असतानाच या नदीच्या पात्रातून दररोज शेकडो लिटर पाण्याची राजरोसपणे चोरी होऊ लागली आहे. सर्वत्र पाणीटंचाईचे चित्र असल्याने टँकरमाफियांच्या टोळ्या या उल्हास नदीतून मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा उपसा करू लागल्या असून जिल्हा प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. उल्हास नदीत मोठय़ा प्रमाणावर घरगुती सांडपाणी आणि औद्योगिक प्रदूषित पाणी मिसळते आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात येईल, असे कुळगाव बदलापूर नगरपालिकेतर्फे सांगण्यात आले. मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. पालिका क्षेत्रातील घरगुती सांडपाण्यासोबतच औद्योगिक सांडपाणीही उल्हास नदीत थेट सोडले जाते. त्यामुळे नदीपात्रात जलपर्णीची निर्मिती होत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. सध्या उल्हास नदीत बदलापूर चौपाटी ते थेट ढोके दापिवलीपर्यंतच्या पट्टय़ात जलपर्णीचा थर पसरला आहे. या दाट विळख्यामुळे नदीतील पाणी दिसेनासे झाले आहे. जलपर्णीमुळे सूर्यप्रकाश नदीपात्रात पडत नसल्याने पाण्यातील माशांना आणि त्यांच्या अन्नप्रक्रियेला मोठा धोका पोहोचू शकतो, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. एकीकडे जलपर्णी उल्हास नदीचा घास घेत असताना बदलापूर, अंबरनाथ तसेच आसपासच्या परिसरातील टँकरमाफिया येथील पाण्यावर डल्ला मारू लागले आहेत. उल्हास नदीवर बदलापूर गावाकडे जाणाऱ्या पुलाखाली चौपाटीजवळ दररोज लाखो लिटर पाणी या टँकरमाफियांकडून चोरले जाते. अनेकदा येथे पाणी भरण्यासाठी टँकरच्या रांगा लागलेल्या दिसतात. त्यामुळे एकीकडे शहरात पाणीबचतीचा संदेश देत पाण्याच्या संवर्धनासाठी प्रबोधन केले जाते, मात्र दुसरीकडे शासन या टँकरमाफियांना मोकळीक देते, असा संदेश सध्या बदलापूरकरांमध्ये जातो आहे. याबाबत लघू पाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसते आहे. याबाबत अंबरनाथचे तहसीलदार प्रशांत जोशी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पाण्याच्या सुरक्षेसाठी लघू पाटबंधारे विभागाला पत्र देण्यात आले आहे, असे सांगितले. तसेच पाणीचोरी रोखण्यासाठी या विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे, असे जोशी यांनी स्पष्ट केले. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे आदेश दिले होते. तसेच नदी प्रदूषण रोखण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. मात्र त्यानंतरही जलपर्णीचा प्रश्न सुटू शकला नाही. तसेच पाटबंधारे विभागाने पाण्याच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक घेण्याची गरज आहे.