मोठा गाजावाजा होऊनही केवळ ३५० इमारतींमध्येच प्रकल्प पावसातील वाया जाणारे पाणी साठून ठेवणे यासाठी ‘रेन हार्वेस्टिंग’ची संकल्पना अस्तित्वात आली. वसई-विरार शहरात त्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला; परंतु केवळ ३५० इमारतींनीच हा प्रकल्प राबविला आहे. पाणीटंचाईवर उपाय म्हणून पावसात वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी रेन हार्वेस्टिंगची संकल्पना पुढे आली. इमारतींवर पाइप टाकून ते जमिनीखालील टाक्यांत साठवून ठेवणे, अशी ही संकल्पना आहे; परंतु नागरिकांकडून या योजनेला हवा तसा प्रतिसाद दिलेला नाही. वसई-विरार शहरात केवळ साडेतीनशे इमारतींनीच रेन हार्वेस्टिंग यंत्रणा राबविल्याची माहिती पालिकेने दिली. एक हजार चौरस फुटांत अडीच लाख लिटर म्हणजे २५ टँकर एवढे पाणी जमा होते. पावसाळ्यातील १२० दिवसांपैकी ७० ते ८० दिवस प्रत्यक्ष पाऊस पडतो. त्यामुळे भरपूर पाणी जमा होऊ शकते. रेन हार्वेस्टिंगची यंत्रणा कार्यान्वित केल्यावर तीन ते चार वर्षांनी त्याचे परिणाम मिळतात. पण वसईतल्या गृहनिर्माण सोसायटय़ांनी या योजनांकडे पाठ फिरवली आहे. भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास या साठवलेल्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. वसईतले केंद्र बंद नवघर-माणिकपूर नगरपरिषदेचे तत्कालीन सभापती भरत गुप्ता यांनी ही संकल्पना मांडून हे रेन हार्वेस्टिंग केंद्र सुरू केले होते. रेन हार्वेस्टिंग म्हणजे काय, ते कसे राबवायचे, त्याचे प्रात्याक्षिक या केंद्रात केले जायचे. सध्या हे केंद्रही बंद पडले असल्याने यासंदर्भातील मोहीम थंडावली आहे.