ठाणे : येथील तीन हात नाका परिसरात बुधवारी रात्री मोबाइलचोरांचा प्रतिकार करताना रिक्षातून पडून एका तरुणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी मोबाइलचोरांना जेरबंद केले.

कन्मिला रायसिंग (२७) असे मृत्युमुखी पडलेल्या या तरुणीचे नाव आहे. अल्केश अन्सारी (२०) आणि सोहेल अन्सारी (१८) अशी आरोपींची नावे असून, ते भिवंडीतील रहिवासी आहेत.

मुंबईतील कलिना भागात राहणारी कन्मिला ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये कामाला होती. बुधवारी रात्री ८ च्या सुमारास ती मैत्रिणींसोबत घरी जाण्यासाठी निघाली. त्यांनी मॉलजवळील रिक्षा थांब्यावरून रिक्षा पकडली. रिक्षा तीन हात नाका येथे आली असता, मागून दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी कन्मिलाच्या हातातील मोबाइल खेचला. प्रतिकार करताना तोल जाऊन कन्मिला रिक्षातून पडली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मैत्रिणीने तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेले. मात्र, उपचाराआधीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण, मोबाइल तपशील तसेच खबऱ्यांमार्फत माहिती मिळवून  अल्केश आणि सोहेल या दोघांना अटक केली. काही दिवसांपूर्वी कळवा येथे मोबाइल चोरट्याचा प्रतिकार करताना रेल्वेगाडीतून तोल जाऊन एका महिलेचा मृत्यू झाला होता.  चोऱ्यांचे प्रकार वाढीस लागले असून, या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.