कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्तावाटपाचा तिढा सुटला आहे. नव्या सूत्रानुसार पहिली अडीच वर्षे महापौरपद शिवसेनेकडे राहणार असून त्यानंतरच्या एका वर्षासाठी पालिकेत भाजपचा महापौर असेल. शेवटचे दीड वर्ष महापौरपद पुन्हा सेनेकडे जाणार असून पालिकेतील स्थायी समितीच्या कारभारासाठी प्रत्येकी दोन-दोन वर्षांची विभागणी करण्यात आली आहे. मात्र, अखेरच्या एका वर्षासाठी स्थायी समितीची सूत्रे कोणाकडे असतील याचा निर्णय अजूनही झालेला नाही. तत्पूर्वी कल्याण-डोंबिवलीत सत्ता स्थापनेच्या हालचालींनी शनिवारी वेग घेतला होता. पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. शिवसेना आणि भाजपकडून पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी युतीचे संकेत देण्यात आले असले तरी शनिवारी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज दाखल करण्यात आले होते. भाजपकडून राहुल दामले आणि विक्रम तरे या दोघांनी अनुक्रमे महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले, तर सेनेकडून राजेंद्र देवळेकर महापौरपदासाठी रिंगणात उतरले आहेत. मात्र, शिवसेना आणि भाजपमध्ये समझोता झाल्याने उद्या भाजपचे राहुल दामले महापौरपदाचा अर्ज मागे घेणार आहेत. भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्याकडे कल्याण-डोंबिवलीच्या सत्तेचा तिढा सोडविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. परस्परांना दूषणे देत, टीका करीत निवडणूक लढवलेल्या शिवसेना-भाजपने कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तास्थापनेसाठी युतीची तयारी दर्शवली होती. मात्र, सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चिन्हे असली तरी महापौरपदावरून उभय पक्षांमध्ये एकवाक्यता झाली नव्हती. महापौरपद मिळणार नसेल तर युती करण्यात रस नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. त्यामुळे युती करण्यात येईल, असे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत असले तरी कोणत्या प्रस्तावावर युती होणार हे गुलदस्त्यातच होते.