ठाण्यामधील कोलशेत खाडी येथे एक कार चिखलात अडकली होती. या कारमधून सहा तरुण प्रवास करत होते. मुंबईलील चेंबूर भागातून फिरण्यासाठी बाहेर पडलेले हे तरुण कारसह कोलशेत खाडी येथे अडकल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मध्यरात्री ३ वाजता ही घटना घडली. अखेर पोलीस आणि महापालिका आपत्ती व्यवस्थापनाने त्यांची सुखरुप सुटका केली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील चेंबुर भागात राहणारे सहाजण मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी कोलशेत खाडी येथे आले होते. यावेळी एक श्वान कारसमोर आल्याने नियंत्रण सुटलं आणि कार कार खाडीच्या चिखलात अडकली. पोलीस आणि महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुमारे अडीच तासांनी कार चिखलातून बाहेर काढली. सर्व सहाजण सुखरूप आहेत.