महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीवनावश्यक वस्तुंवरील जीएसटी इत्यादींच्या मुद्य्यांवरून केंद्र सरकार विरोधात ठाणे शहरात काँग्रेसकडून आज (सोमवार) दुपारी ‘जन आंदोलन’  करण्यात येणार आहे.

“देशात वाढती महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, ढासळलेली अर्थव्यवस्था, अग्निपथ योजनेद्वारे तरुणांचे खच्चीकरण, जीएसटी करामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघालेली आहे. या सर्वाचा विरोध करण्यासाठी आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ काँग्रेस जनआंदोलन करणार आहे.”, असे ठाणे काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे यांनी कळविले आहे.

काँग्रेसने महागाईविरोधात देशव्यापी आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसचे वरिष्ठ नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरताना दिसत आहे. तीन दिवसांपूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबईत विधिमंडळासमोर आंदोलन करण्यात आलं. हा मोर्चा विधिमंडळापासून राजभवनकडे जाणार होता. मात्र, त्याआधीच पोलिसांनी काँग्रेस नेत्यांची धरपकड केली. नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.