Dombivli MIDC Blast Latest Updates: डोंबिवलीतल्या अमुदान कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडून ४५ तास उलटले आहेत. या घटनेत आत्तापर्यंत ११ मृत्यू झाले आहेत. तरीही घटनास्थळावर मानवी अवशेष सापडत आहेत. शोधकार्य करत असणाऱ्या एनडीआरएफच्या जवानांना अनेक मानवी अवशेष सापडले आहेत. काही अवशेष ढिगाऱ्यांखाली तर काही आसपासच्या कंपन्यांमध्ये आढळून आले. यामुळे दिवसभर शोधकार्य सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढंच नाही तर रात्री दोनवेळा एका कंपनीत छोट्या प्रमाणात आग लागली होती ती तातडीने नियंत्रणात आणण्यात आली ज्यामुळे पुढचा अनर्थ टळला.

गुरुवारपासून शोधकार्य सुरु झालं आहे ते अजूनही सुरु आहे

गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत याचा उल्लेख आहे. मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत आणखी तीन मृतदेह कंपनी आवारात सापडले आहेत. ते तातडीने शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले, ही माहिती घटनास्थळावरील वरिष्ठ नियंत्रक अधिकाऱ्यांना मिळाली. ती माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केली. त्यामुळे मृतांची संख्या आठ असल्याचे सांगण्यात आलं. आता या ठिकाणी शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष आढळून येत आहेत.

शुक्रवारीही आढळले मानवी अवशेष

शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी आवार, परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले विविध अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून पालिका शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. अवशेषांनी भरलेली ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केलं होतं. मात्र अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. मृत्यू किती झाले ? याबाबत काहीसा संभ्रम असल्याचं दिसून येतं आहे.

हे पण वाचा- डोंबिवली स्फोट : कंपनीच्या मालकांना अटक; दुर्घटनेप्रकरणी अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

शनिवारी सकाळी काय घडलं?

४५ तास उलटून गेल्यानंतरही डोंबिवलीत स्फोट झाला त्या कंपनीच्या आवारात आणि आसपासच्या आवारात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत. कुणाचे हात, कुणाचे पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे दिवसभर शोधकार्य राबवण्यात येणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होऊ शकणार आहे. या प्रकरणात ज्यांना अटक झाली आहे त्या आरोपींना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

कंपनीच्या मालकांना अटक

डोंबिवलीतल्या अमुदान कंपनी स्फोट प्रकरणात कंपनीच्या दोन्ही मालकांना अटक करण्यात आली. अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना अटक झाली. आज दोघांनाही कोर्टात हजर करण्यात येईल. मालती मेहतांना नाशिकमधून अटक करण्यात आली. तर मलय मेहतांना ठाण्यातून अटक झालीय. स्फोट झाल्यानंतर मालती मेहता यांनी नाशिकमधील आपल्या नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला होता.