भगवान मंडलिकयेत्या डिसेंबर अखेरपर्यंत कल्याण डोंबिवली पालिका परिवहन विभागाच्या (केडीेएमटी) ताफ्यात पर्यावरण स्नेही, प्रदुषणमुक्त विद्युत बस येण्यास सुरुवात होईल. या बस उभ्या करण्यासाठी खंबाळपाडा येथील केडीएमटीच्या आगारातील कचरा वाहू वाहने काढून घ्यावीत म्हणून केडीएमटी कडून दोन वर्षापासून घनकचरा विभागाच्या मागे तगादा लावुनही कचरा वाहू वाहने आगारातून काढली जात नाहीत. घनकचरा आणि परिवहन विभागाच्या शीतयुध्दात येणाऱ्या विद्युत बस कोठे उभ्या करायच्या असा प्रश्न परिवहन विभागासमोर उभा ठाकला आहे. डोंबिवली ते टाटा पाॅवर रस्त्या दरम्यानचा खंबाळपाडा येथील परिवहन बस आगाराचा भूखंडा १५ वर्षापूर्वी भूमाफियांच्या तावडीतून वाचविण्यासाठी तत्कालीन परिवहन उपायुक्त संजय घरत यांनी महत्वाची भूमिका बजावली. या भूखंडावरील अतिक्रमणे जमीनदोस्त करून भूखंडाला संरक्षित भिंत बांधून घेतली. या भूखंडावर दोन वर्षापासून पालिकेच्या लहान, मोठ्या १०० हून अधिक कचरा वाहू वाहने दररोज उभी केली जातात. या वाहनांमधील कचऱ्याची दुर्गंधी परिसरात पसरलेली असते. विद्युत बस आगार प्रदुषण मुक्त वातावरण देशात असावे म्हणून केंद्र शासनाने महापालिकांना पर्यावरण स्नेही विद्युत बस चालविण्याचे आदेश दिले आहेत. या बससाठी १५ व्या वित्त आयोगातून निधी देण्याचे सूचित केले आहे. केडीएमटीला येत्या सहा वर्षात विद्युत बससाठी १०० कोटीची निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतील २६ कोटीचा निधी पालिका तिजोरीत जमा झाला आहे. दरवर्षी ५० बस परिवहन उपक्रमाला ठेकेदार उपलब्ध करून देणार आहे. अशा २०७ विद्युत बस उपक्रमात दाखल होणार आहेत. डिसेंबर पर्यंत ५५ विद्युत बस दाखल होतील. या बसच्या पुरवठ्यासाठीची निविदा प्रक्रिया अंतीम होऊन ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. निविदा प्रक्रियेत खंबाळपाडा आगार विद्युत बस उभ्या करण्यासाठी देण्यात येणार आहे, असे स्पष्ट केले आहे. विद्युत बससाठी खंबाळपाडा आगार सुस्थितीत करण्यासाठी, सुनियोजित यंत्रणा, कार्यशाळा, भारित वीज व्यवस्था, स्वच्छतागृह, निवारे, सुरक्षा दालन, चालक-वाहक विश्रांती गृह उभारणीचे काम ठेकेदाराला करायचे आहे. आगार विनाविलंब रिकामे करून द्या म्हणून केडीएमटीने शहर अभियंता विभाग, घनकचरा विभागाला वारंवार कळविले आहे. या दोन्ही विभागाचे केडीएमटी अधिकाऱ्यांना देत नाहीत, असे परिवहन सुत्राने सांगितले. माजी आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी या महत्वपूर्ण विषयाकेड दुर्लक्ष केले. परिवहन विभागाला एक पैशाचा खर्च न करता ठेकेदाराकडून भाडे तत्वावर या बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे परिवहन मधील एका अधिकाऱ्याने सांगितले. घनकचरा विभागाचे मौन घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांना दोन दिवस सतत संपर्क केला. लघुसंदेश पाठवुनही त्यांनी या विषयी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे घनकचरा विभाग परिवहन विभागाची अडवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले. आताचा ताफा केडीएमटी ताफ्यात आता २०० बस आहेत. ६० बस रस्त्यावर धावतात. दररोज ३५ ते ४० हजार प्रवासी बस प्रवास करतात. दीड ते दोन लाखाचे उत्पन्न उपक्रमाला दररोज तिकीट विक्रीतून मिळते. उपक्रम तोट्यात असल्याने पालिका अनुदानावर अवलंबून राहावे लागते. विद्युत बस साठी खंबाळपाडा येथील आगारात ठेकेदाराला व्यवस्था उभी करायची आहे. डिसेंबरपर्यंत पहिला विद्युत बस ताफा केडीएमटीत दाखल होईल. आगारातील कचरा वाहू वाहने, अडगळ काढण्यासाठी पालिका सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. त्याचा पाठपुरावा केला जात आहे. - डॉ. दीपक सावंत , परिवहन महाव्यवस्थापक , के- डीएमटी