ठाणे : अनंत करमुसे यांचे अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी अखेर सव्वा वर्षांनंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना गुरुवारी सायंकाळी ठाणे पोलिसांनी अटक केली. त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली. पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी या वृत्तास दुजोरा दिला. घोडबंदर येथील कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी एप्रिल २०२० मध्ये गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकत्र्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले. त्यावेळी आव्हाड हे देखील निवासस्थानात उपस्थित होते. त्यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे यांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी करमुसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटकही केली होती. अखेर सव्वा वर्षांनंतर जितेंद्र आव्हाड हे वर्तकनगर पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १० हजार रुपयांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर केला.