वसई-विरारमध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढीग; नागरिकांचा महापालिकेच्या जनजागृतीकडे कानाडोळा ‘कचराकुंडीतच कचरा टाका,’ असे आवाहन वसई-विरार महापालिका विविध माध्यमांतून करीत असली तरी त्याकडे शहरातील नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी कचराकुंडीबाहेर कचरा टाकला जात असून त्यामुळे सार्वजनिक अस्वच्छता निर्माण होत आहे. सध्या ‘स्वच्छ भारत अभियाना’मार्फत देशपातळीवर स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. वसई-विरार महापालिकेच्या वतीनेही अशा प्रकारे जनजागृती केली जाते. ‘सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवा’, ‘इमारतीच्या परिसरात कचरा उघडय़ावर टाकू नये’, ‘ओला व सुका कचरा वर्गीकरण करा’, ‘रस्त्यावर दुकानदारांनी कचरा टाकल्यास दंडनीय कारवाईचा बडगा उगारला जाईल’ अशा प्रकारचे जागृतीचे कार्यक्रम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहेत. मात्र महापालिकेच्या जनजागृतीकडे वसई-विरार शहरातील नागरिकांचे दुर्लक्ष झालेले आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी हिरवा आणि निळ्या रंगाच्या कचराकुंडी जागोजागी ठेवण्यात आल्या आहेत, मात्र घरातील कचरा डब्यात टाकण्याची तसदी न घेता बिंधास्तपणे रस्त्याच्या कडेलाच भिरकावून दिला जातो. श्वान आणि अन्य प्राण्यांद्वारे हा कचरा पसरला जातो आणि त्यामुळे परिसरात दरुगधी निर्माण होते. कचरा साचल्यामुळे डासांचाही प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वसई-विरार महापालिकेने कचरा रस्त्यावर टाकणे, थुंकणे यासाठी दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेत कचरा रस्त्यावर टाकरणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. ही मोहीम अधिक तीव्रपणे पालिका राबवणार असून एकूण नऊ प्रभागांत याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पालिका प्रभाग समिती हद्दीमध्ये स्वच्छता मार्शलही लवकरच नेमण्यात येणार आहेत. - संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका