ठाणे : महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाली असून यामुळे पुढील चार दिवस शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पाणी कपात झाल्याने ठाणेकरांना ऐन उन्हाळय़ात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्रोतांमार्फत दररोज ४८५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या योजनेतून २१० दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या योजनेसाठी भातसा धरणाच्या पिसे बंधारा येथून पाणी उचलण्यात येते. या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी अचानकपणे कमी झाल्यामुळे महापालिकेला पुरेसा पाणी उचलणे शक्य होत नाही. या कारणांमुळे शहरामध्ये पुढील चार दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. या बंधाऱ्यातून ५ ते १० टक्के कमी पाणी पुरवठा होत असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.