छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करुन तिथे लूट केली होती. त्याचा बदला घेतला जातो आहे त्यामुळेच मुंबईतला हिरे बाजार हा सूरतला नेण्यात आला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मुंबईचं महत्व कमी केलं जातं आहे मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईचं गोल्ड मार्केट आणि मुंबईचं डायमंड मार्केट हे मुंबईचे दोन आधार स्तंभ आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मुंबईचा दबदबा निर्माण झाला तो अशा बाजारपेठांमुळेच निर्माण झाला. मुंबईकर हे कष्ट करणारे, प्रामाणिक, सोशिक आणि समजदार आहेत. मात्र मुंबईचं महत्त्व आंतरराष्ट्रीय दर्जावर कमी करण्याचं काम गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळेच अनेक प्रमुख संस्था या मुंबईतून बाहेर गेल्या आहेत असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. मुंबईला कमकुवत करण्याची मानसिकता कुणाची हे सगळ्यांना ठाऊक "मुंबईला कमकुवत करण्याची मानसिकता कुणाची? हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पण कमीत कमी हिरे उद्योग तरी जाऊ द्यायला नको होता. बीकेसीच्या कोपऱ्यावर एक मोठी इमारत उभी राहते आहे. अशात आता हिरे व्यापारच गुजरातला जाणं हे महाराष्ट्रासाठी अपमानास्पद आहे. मुंबईचा स्वतःचा असा एक सुगंध आहे तो सगळीकडे दरवळत असतो. त्याला कुणाची तरी नजर लागली. मुंबईचं महत्त्व जाणीवपूर्वक कमी केलं जातं आहे आणि आपण त्याला काहीच उत्तर देऊ शकत नाही हे दुर्दैवी आहे." असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. सुरत व्यापारात एके काळी खूप पुढे होता. इंग्रज आणि दिल्लीचे सुलनात हा कारभार चालवत होते. तिथल्या वखारी छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटल्या. त्यांनी त्यातून महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी, रयतेसाठी केला. मात्र तो राग अजूनही काहींच्या मनात आहे त्यामुळेच मुंबईचा असा बदला घेतला जातो आहे. असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. कतार प्रश्नीही प्रतिक्रिया कतारमध्ये आठ माजी नौसैनिकांना इस्रायालसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून फाशी दिली जाणार आहे. मूळात या संदर्भात खटला सुरू आहे, याची माहितीच देशाला परराष्ट्र मंत्रालयाने दिली नव्हती. इस्रायलची मोसाद गुप्तहेर संघटना ही जगातील सर्वोत्तम गुप्तहेर संघटना आहे. अशा स्थितीत भारतीय इस्रायलसाठी हेरगिरी करतील, हे अनाकलनीय आहे. पण, आपला आंतराष्ट्रीय पातळीवरील दबदबा आहे, अशी आवई उठविणाऱ्यांनी त्या आठ जणांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्या आठ जणांना फासावर चढवल्याने त्यांचे कुटुंबीय वाऱ्यावर पडणार आहे, याची जाणीव ठेऊन त्या आठ जणांचे जीव वाचवण्यासाठी आंतराष्ट्रीय पातळीवर सरकारने प्रयत्न करावेत, असे आवाहन आव्हाड यांनी केले.