दुरुस्तीच्या कामामुळे ठाण्यात दीर्घकाळ वाहतूक कोंडीची शक्यता ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीस अत्यंत महत्त्वाच्या अशा कोपरी रेल्वे उड्डाणपुलाच्या जुन्या पुलाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मध्य रेल्वेकडून मंगळवारी रात्री ७पासून हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे जुन्या पुलावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. कोपरी रेल्वे पुलावरील नव्या पुलावरून तसेच बाराबंगलामार्गे ही वाहतूक सुरू राहील. जुन्या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. त्यामुळे पुढील दीड वर्ष ठाणेकरांना वाहतूक कोंडीत अडकावे लागण्याची शक्यता आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरून मुंबई-ठाण्याच्या दिशेने हजारो वाहने वाहतूक करत असतात. या मार्गावरील कोपरी उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी अरुंद असल्याने २०१८ पासून एमएमआरडीए आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून या पुलाच्या दुरुस्तीचे आणि रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. काही महिन्यांपूर्वीच एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासनाने ठाण्याच्या दिशेने आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी दोन नव्या मार्गिका उपलब्ध केल्या आहेत. आता मंगळवारी रात्री ७ वाजेपासून उर्वरित जुन्या पुलाचे बांधकाम हाती घेण्यात येणार आहे. सुमारे दीड वर्ष हे काम सुरू राहण्याची शक्यता आहे. वाहतूक बदल * दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना नव्या आणि जुन्या कोपरी रेल्वे उड्डाणपुलावरून वाहतूक करण्यास प्रवेशबंदी असेल. येथील वाहने सेवारस्ता, बाराबंगलामार्गे मुंबईच्या दिशेने जातील, तर मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणारी दुचाकी आणि तीनचाकी वाहने आनंदनगर येथून उजवीकडे वळण घेऊन बाराबंगलामार्गे तीन हात नाक्याच्या दिशेने येतील. * चारचाकी तसेच इतर वाहनांना नव्या कोपरी पुलावर प्रवेश असेल. ही वाहने नव्या पुलावरून वाहतूक करू शकतात.